CM Eknath Shinde Vision : एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन (Majha Maharashtra Majha Vision) या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना 'मुख्यमंत्री व्हायचं हे कधी मनात आलं?', असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर एकनाथ शिंदे हसले आणि म्हणाले, मी मुख्यमंत्री होण्यासाठी हे केलंच नाही. मोदी आणि शाह साहेबांनी लोकांच्या मनात जे होतं त्याच्या अगदी विरुद्ध केलं. यात देवेंद्रजी यांच योगदान मोठं आहे. 'माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन' या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राबाबतचं त्यांचं व्हिजन मांडलं. यावेळी त्यांनी एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी त्यांची मुलाखत घेतली. 


2019 मध्येच जनतेचा कौल मानून सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न : एकनाथ शिंदे


मुख्यमंत्री होणार हे बंडाआधी माहित होतं का? यावर एकनाथ शिंदे म्हणाले की, "मी मुख्यमंत्री होण्यासाठी हे केलंच नाही. लोकांनी जो कौल दिला ते सरकार स्थापन झालं पाहिजे, असा कल आमचा सुरुवातीपासूनच होता. परंतु प्रयत्न करुनही आम्हाला यश मिळालं नाही. महाविकास आघाडीमध्ये आमच्या विचारांशी न जुळणारं गणित होतं. त्यात मी जात नाही, कोणाला दोष देत नाही. शिवसेना भाजपची अनेक वर्षांची युती होती. लोकांनी पण आम्हाला त्यामुळेच मतदान केलं. बाळासाहेब आणि मोदी साहेबांना समोर आम्ही लोकांसमोर गेलो. लोक आमच्यासारखं बोलत नाही, ते मतपेटीतून बोलतात. खरंतर मोदी आणि शाह साहेबांचे आभार मानले पाहिजे. कारण लोकांच्या मनात जे होते, त्याच्या अगदी विरुद्ध त्यांनी केलं. भाजपचा मुख्यमंत्री होईल असं लोकांचं मत होतं कारण आमदार जास्त होते. भाजप सत्तेसाठी तोडफोड करत नाही. तर महाराष्ट्रामध्ये विकास झाला पाहिजे. राज्याला चांगले दिवस आले पाहिजेत ही भूमिका ठेवून त्यांनी तो निर्णय घेतला. यात देवेंद्रजी यांचीही भूमिका मोठी आहे, त्यांचं योगदान मोठं आहे.



महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी नेत्यांचं व्हिजन


महाराष्ट्रात (Maharashtra News) सध्या बाळासाहेबांची शिवसेना (Balasahebanchi Shiv Sena) आणि भाजप (BJP) यांचं संयुक्त सरकार आहे. मात्र, असं असलं तरी गेल्या काही महिन्यांमध्ये राज्याने पाहिलेलं अभूतपूर्व राजकीय बंड, आणि त्यानंतरचे आरोप प्रत्यारोपांच्या तोफा अद्याप थंडावलेल्या नाहीत. अशा तोफांचा सामना करतानाच राज्याच्या विकासात कसूर न करता राजकीय लढाई लढत राहणं हा समतोल सध्या सत्ताधारी आणि विरोधक या दोघांनाही करावा लागत आहे. अशात पुरोगामी महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांना राज्यातल्या सद्यस्थितीबाबत काय वाटतंय. अशा परिस्थितीत राज्याच्या प्रगतीची दिशा कशी असेल. महाराष्ट्राला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी या नेत्यांचं व्हिजन काय असेल याबद्दल या सर्व नेत्यांशी आज दिवसभर आम्ही दिलखुलास संवाद साधणार आहोत.