India Alliance : नवी दिल्ली : देशभरात लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha Election 2024) गेले दीड महिने धामधूम पाहायला मिळाली. त्यात देशभरात एनडीए (NDA) विरुद्ध इंडिया आघाडी (India Alliance) अशी काटे की टक्कर पाहायला मिळाली. आता लोकसभा निवडणुकीचा शेवटचा टप्पा राहिला आहे. त्यात 1 जून रोजी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांची महत्वपूर्ण बैठक दिल्लीत (Delhi) बोलावण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या बैठक कशासाठी आहे? इंडिया आघाडीचा काय प्लॅन आहे? उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शरद पवार उपस्थित राहणार का? असे अनेक प्रश्न चर्चेत आहे. 


लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जूनला लागणार आहे. अशा परिस्थितीत निकालापूर्वीच इंडिया आघाडीची दिल्लीत 1 जूनला बैठक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. निवडणुकीनंतरची परिस्थिती लक्षात घेऊन होणाऱ्या बैठकीत आपापसांत एकजूट ठेवण्याचा प्रयत्न आणि पुढील तयारीची रणनीती या बैठकीत ठरणार आहे.


1 जून रोजी दिल्लीत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत सर्व मित्रपक्षांना सहभागी होण्याचं निमंत्रण देण्यात आले आहे. निवडणूक आणि निकालानंतरच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ही बैठक होत असल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे या बैठकीला देशातील घटक पक्षाचे आणि राष्ट्रीय पक्षाचे कोणते महत्वाचे नेते उपस्थित राहतात, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


इंडिया आघाडीची बैठक अशा वेळी होत आहे जेव्हा लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. निवडणूक निकालापूर्वी विरोधी पक्षनेत्यांची ही बैठक घेतली जात आहे. याबाबत अद्याप स्पष्टपणे काहीही सांगण्यात आलेलं नाही, परंतु आम आदमी पार्टीचे निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाचा शेवटचा दिवस आहे, त्या दिवशी ही बैठक नियोजित करण्यात आली आहे.


दिल्लीत होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जाण्याची शक्यता कमी आहे. कारण उद्धव ठाकरे सध्या परदेशात आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे या बैठकीला जाऊ शकतात आणि ठाकरे गटाकडून या बैठकीला पक्षाचा प्रतिनिधी पाठवला जाईल. तसेच, शरद पवार देखील परदेशात आहेत, ते थेट एक जूनला दिल्लीत उपस्थित राहतील.


दरम्यान, लोकसभा निवडणुकीचे निकाल काय लागतात? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. एकीकडे भाजप निवडणुकीनंतर शांत पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे निकाल लागल्यावर इंडियाची रणनीती काय असणार? याविषयी इंडिया एक जूनला होणाऱ्या इंडिया गाडीच्या बैठकीत सगळं ठरणार आहे.