Mahayuti Meeting : विधानसभा निवडणुकीच्या (Vidhansabha Election) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी दौरे, सभा, संवाद सुरु केले आहेत. दरम्यान, मध्यरात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), खासदार प्रफुल्ल पटेल. मंत्री दादा भुसे तसेच मंत्री उदय सामंत यांच्यात वर्षा बंगल्यावर महत्वाची बैठक पार पडली आहे. राज्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूकाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्व आहे.


बैठकीत कोणत्या मुद्यांवर चर्चा


शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉग्रेसच्या राज्यभरात आमने सामने येऊ शकणाऱ्या जागांवर बैठकित सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या प्रसार आणि प्रचार यासाठी शिवसेनेकडून बनवण्यात आलेला अहवालावरही उपस्थित नेत्यांमध्ये सविस्तरचर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


योजना लोकापर्यंत पोहोचवण्याबाबत चर्चा


दरम्यान, बैठकीनंतर उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या नेतत्वाखाली आखण्यात आलेल्या योजना लोकापर्यंत पोहोचवण्याबाबत आज चर्चा झाल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. मुख्यमंत्री स्वत: बहिणींची भेट घेऊन माहिती घेत आहेत हे कौतुकास्पद असल्याचे सामंत म्हणाले. आम्ही योजना काढली तेव्हा काहीजण कोर्टात गेले होते असंही ते म्हणाले. 


महायुतीमध्ये 41 मतदारसंघात वाद निर्माण होण्याची शक्यता


महायुतीमध्ये जवळपास 41 मतदारसंघात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 41 मतदारसंघांची माहिती एबीपी माझाच्या हाती आली आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना यांच्यात उमेदवारीवरून रस्सीखेच सूरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत महायुतीच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांनी लवकरात लवकर वादातीत मतदारसंघांबाबत बैठक घेऊन विषय सोडवावा, अशा सूचना अमित शाहा यांनी दिल्या आहेत.  याच आठवड्यात राज्यातील महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होऊन वादातीत मतदारसंघाबाबतचा निर्णय सामोचाराने सोडवण्यात येण्याची दाट शक्यता आहे. 


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जुलै 2023 मध्ये शरद पवारांच्या विरोधात भूमिका गेत महायुतीमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महायुतीमध्ये आणखी एका पक्षाची वाढ झाली. वरिष्ठ पातळीवर हा निर्णय झाला असला तरी स्थानिक पातळीवर महायुती म्हणून निवडणूक लढवताना अनेक अडचणी येत असल्याचे पाहायला मिळत आहे. उमेदवारी मिळणार असं जाणवल्यानंतर अनेक नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये परतत आहेत.


महत्वाच्या बातम्या:


Mahayuti : महायुतीमध्ये जवळपास 41 मतदारसंघात वाद निर्माण होण्याची शक्यता, बैठक घेऊन वाद सोडवावा; अमित शाहांच्या सूचना