Udayanraje Bhosale : छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला देश आणि संपूर्ण जगाला लोकशाहीचा पाया घालून दिला. अजूनही जगभरात असे देश आहे, जिथे राजेशाही आहे. त्यावेळी त्यांनी विचार केला असता राजेशाही अस्तित्वात ठेवायची, तर आजही देशात राजेशाही असती. मात्र सर्वात आधी राज्य कारभारात लोकांचा समावेश व्हावा वेगवेगळ्या जाती धर्मातील लोकांना न्याय मिळावा. त्यांचं प्रतिनिधत्व असावं म्हणून त्यांनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली, असं खासदार उदयनराजे भोसले म्हणाले आहेत. एका आयोजित पत्रकार परिषदेत ते असं म्हणाले आहेत. शिवाजी महाराजांच्या जयंतीबद्दल बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले की, ''आज तीन शिवजयंती साजरी केली जाते, ही अवहेलना नाही का महाराजांची, श्रेय वादासाठी काही करत असतील तर मला काही बोलायचे नाही.''


तत्पूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान करणारे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांषु त्रिपाठी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. आज पुन्हा त्यांनी याच मुद्द्यावर पत्रकार परिषद घेतली.


सर्वधर्म समभावची व्याख्या आता बदली आहे का? : उदयनराजे भोसले


उदयनराजे भोसले म्हणाले की, प्रत्येक प्रादेशिक आणि राष्ट्रीय पक्ष हे वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतात. आदर्श मानतात. मात्र मला आणि अनेक नागरिकांना असा प्रश्न पडला आहे की, सर्वधर्म समभावची व्याख्या आता बदली आहे का? सर्वधर्म समभाव म्हणजे फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि समाजातील विविध धर्मातील लोकांमध्ये फूट पडायचं काम करायचं, हे कितपत योग्य आहे. ते म्हणाले, आज ठिकठिकाणी जेव्हा शिवाजी महाराजांचा सर्वधर्म समभावाचा विचार सांगता,  तेव्हा प्रत्येक पक्षात सर्व जाती धर्माचे लोक असले पाहिजे. अजेंडा काही असू दे, तुम्ही महाराजांचे विचार आचरणात आणत नाही, मग छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव तरी का घ्याचं.


उदयनराजे भोसले पुढे म्हणाले, आधी पाकिस्तान, भारत आणि बांगलादेश हे एक खंड होतं. त्याआधी शिवाजी महाराज जन्माला आले होते. त्यावेळी काय झालं, पाकिस्तान, भारत आणि बांगलादेश  वेगळा झाला. आज असंच चालत राहिलं, तेव्हा तीन तुकडे झाले. आता प्रत्येकजण आपल्या धर्माचा विचार करत राहिला तर समाजात तेढ निर्माण होईल. तेव्हा तीन तुकडे झाले. आता किती होतील. ते पुढे म्हणाले, प्रत्येक राज्य हे वेगळं देश होणार आहे का? मी नेहमी सांगत असतो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार आहे. याच विचारणे देशाला अखंड ठेवलं आहे. आज जगभरात आपल्याला सर्वात मोठी लोकशाही म्हणून पाहिलं जात. मात्र महाराजांच्या विचारांचा विसर पडला तर काय होईल? असं ते म्हणाले आहेत.