धुळे : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने धुळे जिल्ह्यातील साक्री येथे ठेलारी समाजाचा मेळावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी बोलताना सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजपवर कडाडून टीका केली. तर या देशातील ईडी आणि इन्कम टॅक्स विभाग भाजप सरकार चालवतंय असा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला.


भारतीय जनता पार्टी शेतकरी आणि शेतकऱ्यांवर अवलंबून असणाऱ्या सगळ्यांना समूळ नष्ट करण्याचे काम करत आहे. वाढत्या इंधन दरवाढीचं खापर पेट्रोलियम मंत्र्यांनी स्वतःच्या सरकारवर फोडलं असून कोरोनाची लस मोफत दिली म्हणून पेट्रोल दरवाढ करण्यात आल्याचं केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी सांगितले. मात्र, शंभर रुपये दराने पेट्रोल घेणाऱ्यांनी लस कितीला पडली याचा विचार करावा असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी यावेळी उपस्थित केला.


आयकर विभागाच्या धाडीत धक्कादायक माहिती उघड! हजार कोटींहून अधिक रुपयांचे व्यवहार


ठेलारी समाज कोणत्या प्रवर्गात येतो हेच मंत्र्यांना माहिती नाही
सामाजिक न्याय मंत्री असलेल्या असलेल्या धनंजय मुंडे यांना ठेलारी समाज कोणत्या प्रवर्गात मोडतो हेच माहीत नसल्याचे दिसून आले. यावेळी सामाजिक न्याय राज्यमंत्री धनंजय मुंडे यांनी ठेलारी समाजाचा ब मधून ड गटात वर्ग करण्याचा उल्लेख केला. मात्र, सामाजिक न्याय राज्यमंत्री यांची स्वतःची चूक लक्षात येताच त्यांनी सारवासारव केल्याचा प्रकार यावेळी घडला.


देशात आणि राज्यात भाजप शेतकऱ्यांवर कसा अन्याय करत आहे तसेच त्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना कसा चिरडले जाते हे आपण पाहिलं. शेतकऱ्यांना चिडणाऱ्या मंत्राच्या मुलाला पकडण्यासाठी पाच ते सहा दिवस लागतात. मात्र, एवढी मोठी घटना होऊन देखील देशाच्या पंतप्रधानांनी साधं दुःखदेखील व्यक्त केलं नाही. आपली फसवणूक करणारे सरकार केंद्रात बसलं असून या देशातील इन्कम टॅक्स विभाग भाजप सरकार चालवतं असा आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी केला. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर दहावेळा धाड टाकून देखील त्यांना काय मिळालं? याचादेखील खुलासा करावा असे आवाहन जयंत पाटील यांनी यावेळी केले.