भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा; SIT आधीच नेमल्याची माहिती, उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचाही सहभाग?
अशोक खरात प्रकरणाच्या चौकशीसाठी विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वीच SIT नेमण्यात आली आहे. मात्र, निम्मं मंत्रिमंडळ यात असल्याने हे प्रकरण बाहेर येऊ द्यायचं नव्हतं.

रत्नागिरी: रुपाली चाकणकरांचा राजीनामा घेतला ते चांगलंच झालं, पण केवळ त्यांच्यापर्यंतच हे प्रकरण नाही. याप्रकरणात अनेक उच्चपसदस्थ अधिकारी आहेत, असा खळबळजनक दावा करत शिवसेना उबाठा पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी एसआयटी (SIT) नेमणुकीसंदर्भातही मोठा गौप्यस्फोट केला आहे. राज्यभरात गाजत असलेल्या अशोक खरात (Ashok kharat) प्रकरणावरुन पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी परखड भाष्य केलं. पाणी कुठपर्यंत मुरलंय ते कळू द्या, म्हणत सखोल चौकशीची मागणी केली. त्यानंतर, आता भास्कर जाधव (Bhaskar jadhav) यांनीही अनेक दावे केले आहेत.
अशोक खरात प्रकरणाच्या चौकशीसाठी विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वीच SIT नेमण्यात आली आहे. मात्र, निम्मं मंत्रिमंडळ यात असल्याने हे प्रकरण बाहेर येऊ द्यायचं नव्हतं. केवळ पत्रकार आणि पीडित महिलेमुळे हे प्रकरण बाहेर आलं, अन्यथा हे प्रकरण सरकारने प्रकरण दाबलं असतं, असा गौप्यस्फोट भास्कर जाधव यांनी आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केलाय. तसेच, याप्रकरणी SIT कधी नेमली याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राला द्यावी, अशी मागणीही त्यांनी केलीय.
अधिवेशन काळात सरकारने याबाबत वस्तुस्थिती मांडणे गरजेचे होते. कारण, यात फक्त रुपाली चाकणकर आणि राजकीय पुढारी आहेत असे नाही, यात उच्चपदस्थ अधिकारी देखील असून अशोक खरातची उठबस करण्यात ते गुंतले आहेत. केवळ चाकणकर यांचा राजीनामा घेऊन सरकारने या विषयावरील लक्ष दुसरीकडे वळवू नये, राजीनामा झाला म्हणजे प्रकरण संपलं असं समजू नये. सरकारमधले अनेक मंत्री आणि अधिकारी यात असल्याने हे प्रकरण दडपवण्याचा प्रयत्न होत असल्याचं भास्कर जाधव यांनी सांगितलं.
खरात प्रकरणात आत्ता एसआयटी नेमल्याचं सांगितलं जातंय, पण अधिवेशनाच्या आधी SIT नेमली आहे. मात्र, निम्मं मंत्रिमंडळ यात असल्याने हे प्रकरण बाहेर येऊ द्यायचं नव्हतं. केवळ पत्रकार आणि पीडित महिलेमुळे प्रकरण बाहेर आलं अन्यथा हे प्रकरण सरकारने प्रकरण दाबलं असतं. या प्रकरणात आयएएस, IPS अधिकारी आहेत. हे प्रकरण पोलिसांना देखील माहित होतं, म्हणून हे प्रकरण बाहेर आलं नाही, असा खळबळजनक दावा भास्कर जाधव यांनी केलाय. त्यामुळे, हे प्रकरण तडीस जावं यासाठी आमचा प्रयत्न असेल. मात्र, सरकारची एकूण वृत्ती पाहून काही पुढारी आणि अधिकाऱ्यांच्या फाईल्स आपल्या ढुंगणाखाली दाबून ठेवून ते राजकीय फायद्यासाठी वापरतील, असा दावाही भास्कर जाधव यांनी केलाय.
राजकीय पुढाऱ्यांना अघोरी विद्या आणि अघोरी प्रकार कशाला लागतात हे कळत नाही. शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेऊन असे शेण खाणाऱ्या लोकांना चांगला धडा शिकवला पाहिजे. पण, या सरकार कडून ही अपेक्षा नाही. आमचा महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्र म्हणून सांगतो. आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज म्हणून उर बडवतो. आम्ही अंधश्रद्धा निर्मूलनाचे कायदे करतो आणि दुसऱ्या बाजूला काय सुरू आहे याचा विचार करणे गरजेचे असल्याचेही मत भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषदेतून मांडले.
राज्यकर्त्यांकडून पाठराखण
या प्रकरणाचे धागेदोरे खोलवर गुंतले असून राज्यकर्त्यांकडून अनेकांना पाठिशी घालून गुन्हेगारी प्रवृत्तीला बळ देण्याचे काम सुरू आहे. पावसाळी अधिवेशनत नाशिकमधील हॉटेलचा उल्लेख झाला तेव्हा राज्यकर्त्यांनी मागचा पुढचा विचार न करता प्रकरणाला क्लीन चिट दिली. नाशिकमधलं प्रकरण कळायला एवढा उशीर का? असा सवालही जाधव यांनी केला.
मविआ सरकारने पाणी दिलं
मविआ सरकारच्या काळात शिवनिका संस्थेला पाणी दिलं यात राज्यकर्त्यांना दोष देऊन चालणार नाही, या प्रकरणात अनेक वरिष्ठ अधिकारी आहेत, असा खुलासा भास्कर जाधव यांनी केलाय.
Before You Go
Aaditya Thackeray NEET: नीट आंदोलनात गुन्हे दाखल झालेल्या ठाकरेंची मदत, केस लढण्यासाठी वकील मैदानात उतरवणार, आदित्य ठाकरेंची माहिती






















