Amravati Lok Sabha Election 2024 : रंगबाजीने निवडणूक लढवली जात असेल तर आम्ही भिणारे नाही, असं वक्तव्य प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांना दिला आहे. तुमच्यासोबत कुणाचा आशीर्वाद आहेत? त्याची मस्ती आहे, असं म्हणत बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी भाजपलाही खडेबोल सुनावले आहेत. आमची नाराजी नवनीत राणांवर आहे, असंही बच्चू कडू यांनी स्पष्ट केलं आहे.


आम्ही कुणाला भिणार नाही : बच्चू कडू


आमची लढत मैत्रीपूर्ण आहे. इतक्या रंगबाजीने जर निवडणूक लढवली जात असेल तर, आम्ही कोणाला भिणारे नाहीत. ही पैशाची, सत्तेची मस्ती आहे की, तुमच्यासोबत कुणाचा आशीर्वाद आहे? त्याची मस्ती आहे का, असा सवाल बच्चू कडूंनी विचारला आहे. स्वतः उमेदवार अशा पद्धतीने वागत असेल तर कार्यकर्त्यांची मानसिकता राहिलेली नाही. दिनेश बुब आमचे चांगले मित्र आहेत. पण आमचा उमेदवार हा भाजपातून आलेला असेल, असंही आमदार बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.


विदर्भाबाबत लवकरच निर्णय घेऊ


सुप्रीम कोर्ट काहीही करणार नाही. कोर्टाने तीन चार वर्ष काहीही केलं नाही. आताही ते काही करणार नाहीत. न्यायालयातील भूमिका फार समाधानकारक आहे असं नाही. राज्यात काही चांगले उमेदवार आहेत, ज्यांच्यासोबत राहिलं पाहिजे, जसं राजू शेट्टी आहेत. शेतकऱ्यांसाठी लढणारा उमेदवार आहे, पण सध्या फक्त अमरावती आणि विदर्भात काय करायचं ते पाहू.


आमची नाराजी नवनीत राणांवर


जालना येथून कार्यकर्त्यांनी बरेचदा आग्रह केला, पण ते शक्य झालं नाही. मात्र वर्धा मतदार संघात दोन तालुके अमरावती जिल्ह्यातील येतात. कार्यकात्यांसोबत बोलून चाचपणी करू, निवडून येण्याची शक्यता दिसली तर पुढे जाऊ. आमची नाराजी नवनीत राणांवर आहे. मी समजून घेईल पण कार्यकर्ते समजून घ्यायला तयार नाही. उद्या जर माझाच पक्ष अडचणीत येत असेल तर कसं शक्य आहे? हे होणार नाही. काही गोष्टी नाही ऐकल्या जाऊ शकत. 


अमरावतीत बच्चू कडू स्वतंत्र लढणार


लोकसभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीत जागावाटपाचा तिढा अजून सुटत नाहीय. अशातच महायुतीचे मित्रपक्ष बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्षाने अमरावती लोकसभा स्वतंत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे. अमरावती लोकसभेसाठी भाजपकडून नवनीत राणा यांना तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते आणि त्यामुळेच बच्चू कडू आणखीनच नाराज झाल्याचं दिसतं आहे. याच नाराजीमुळे बच्चू कडू महायुती सोडून स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेऊ शकतात. तसंच, अमरावतीमध्ये चांगला उमेदवार मिळाला, अशी भूमिका बच्चू कडू यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली आहे. बच्चू कडूंच्या या भूमिकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना चर्चेसाठी मुंबईत बोलवलं आहे. येत्या 26 तारखेला बच्चू कडू मुंबईत येऊन मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


मोठी बातमी : बच्चू कडू महायुतीतच, फक्त अमरावतीत स्वतंत्र लढणार; 3 तारखेला उमेदवारी जाहीर करणार