Arvind Sawant on Aurangzeb Tomb: छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथे असलेल्या औरंगजेबाची कबर (Aurangzeb tomb) हटवण्याच्या मुद्यावरुन राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलंय. महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर (Aurangzeb tomb) हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलानं दिला आहे. दरम्यान याच मुद्यावरून आता राजकारण देखील तापले आहे. तर, दुसरीकडे औरंगजेबाची कबर हटविण्यासाठी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद आक्रमक झाल्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढविण्यात आली आहे.
अशातच "औरंगजेबाची कबर महाराष्ट्रातच राहु द्या" अशी भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shivsena UBT) खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) यांनी मांडली आहे. औरंगजेबाला इथंच गाडलाय हा इतिहास आहे, तो तसाच राहिला पाहिजे ताराराणी आणि इतर शिवरायांच्या मावळ्यांचा तो इतिहास आहे. दरम्यान, कबर हटवून कुणाच्या घरची चूल पेटणार आहे का? असा सवाल ही त्यांनी केला आहे. तर अबु आझमींचं वक्तव्य हे नेमकं अधिवेशनाच्याच काळात कसं येत?, त्यांचा बोलविता धनी कोण?राज्यात शेतक-यांच्या आत्महत्या सुरूच आहेत, त्या मुद्यांकडे अधिक गांभीर्यानं बघायला हवं, असेही खासदार अरविंद सावंत म्हणाले.
मुंबई रेल्वे स्थानकावर कायमस्वरूपी महाराजांचा मेघडंबरीतील पुतळा बसवा- अरविंद सावंत
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दक्षिण मुंबई विभाग क्रमांक 12 तर्फे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज ट्रर्मिनस येथे कायमस्वरूपी छत्रपती शिवाजी महाराजांचा मेघडंबरीतील पुतळा बसवण्यात यावा, या मागणी करता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याची प्रतिष्ठापना व पुष्पहार अर्पण करून शिवजयंती साजरी करण्यात येत आहे. यावेळी बोलताना अरविंद सावंत यांनी औरंगजेबाची कबर (Aurangzeb tomb) हटवण्याच्या मुद्यावर भाष्य करत आपली भूमिका मांडली आहे.
औरंगजेबाची कबर, लव जिहाद आजच दिसला का? संजय जाधव
राज्यात सर्व जण गुण्यागोविंदात नांदत असताना सरकारमधील मंत्रीच जर दुही निर्माण करण्याचे काम करत असेल तर हा देशद्रोह,राष्ट्रद्रोह नाही का? तुम्हाला आज औरंगजेबाची कबर दिसते, का आज लव जिहाद दिसतोय? राज्यात निर्माण झालेल्या प्रश्नांना बगल देण्यासाठी हे सगळं केल जात असल्याची टीका परभणीतील उबाठा सेनेचे खासदार संजय जाधव यांनी केलीय.
जायकवाडीचे पाणी परभणी जिल्ह्याला ठरलेल्या साठ्याप्रमाणे दिले जात नसल्याने आज खासदार संजय जाधव जायकवाडी पाठबंधारे कार्यालयाला टाळे ठोकणार असुन याच संदर्भात बोलत असताना त्यांना औरंगजेबाची कबर हटवण्याबाबत सुरू असलेल्या प्रकरणावर विचारले असता त्यांनी सरकारवर जोरदार टीका केलीय. भाजपचे सरकार केंद्रात आहे, राज्यात आहे. मग याबाबत करा ना कायदेशीर कारवाई. एखादे विधेयक आणा चर्चा करा, मग काय होते त्याचा निर्णय घ्यावा. मात्र आज राज्यात घरातील चुली पेटवन्याऐवजी घर पेटतील असे कृत्य करू नये, असेही आवाहन त्यांनी केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या