Akola News: अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) 'ऑनलाइन पालकमंत्री' असल्याचा टोला ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी लगावलाय. आमदार अमोल मिटकरींच्या (Amol Mitkari) प्रतिक्रीयेनंतर आता ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. अकोल्यात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांच्या प्रतिक्रियेनंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांसह  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केलंय.


राज्याचे महसूल मंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील वेळ देत नसल्याची प्रतिक्रिया मिटकरी यांनी केली होती. त्यानंतर ठाकरे गट आक्रमक झाला असून पालकमंत्री विखे पाटलांचा विरोधात त्यांनी घोषणाबाजीसह ठिया आंदोलनही केलंय.


विखे पाटील ऑनलाइन पालकमंत्री- आमदार नितीन देशमुख


अकोल्यात आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विखे पाटील ऑनलाइन उपस्थित राहणार असल्याचे कळताच आमदार नितीन देशमुख यांनी विखे पाटलांवर चांगलाच निशाणा साधलाय. यावेळी विखे पाटील हे ऑनलाईन पालकमंत्री असल्याची टीका करत ठाकरे गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान पालकमंत्री विखे पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली. विखे पाटलांना आता कोरोना काळ सुरू झाला असेल म्हणूनच ऑनलाईन बैठका घेत असल्याचा टोला आमदार नितीन देशमुख यांनी लगावलाय. 


अकोल्यात  आता युतीतील घटक पक्षातील आमदार अमोल मिटकरी यांच्या नाराजीनंतर काँग्रेस आणि ठाकरे गट अकोल्याचे पालकमंत्री ऑनलाईन पालकमंत्री असल्याची टीका करताना दिसतायत.


अमोल मिटकरी काय म्हणाले?


आमदार अमोल मिटकरी यांनी दिलेल्या प्रतिक्रिया नंतर ठाकरे गट अकोल्यात चांगलाच आक्रमक झालेला दिसतोय. राज्याचे महसूल मंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री असणारे राधाकृष्ण विखे पाटील अकोल्याला वेळ देत नाहीयेत अशी प्रतिक्रिया आमदार अमोल मिटकरी यांनी दिली होती. दरम्यान अकोल्यात आज होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विखे पाटील ऑनलाइनच उपस्थित राहणार असल्याचे कळताच ठाकरे गटाने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधत ठिय्या आंदोलन केलंय.


अमोल मिटकरी बोलताना म्हणाले की, "अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत. गेल्या सहा महिन्यांत अकोला जिल्ह्यातील वेगवेगळ्या घटना पाहता, राधाकृष्ण विखे पाटील स्वतः अजिबात उपस्थित राहिले नाहीत. मागची जिल्हानियोजन बैठक होती, त्यावेळीही ते व्हिसीद्वारे उपस्थित होते. गेल्या आठ दिवसांपासून अकोल्यातील शेतकऱ्यांसंदर्भातील विषय फार महत्त्वाचे असल्याचं पाहायला मिळत आहे. संबंध जिल्ह्यात भरपूर पाऊस आहे. बऱ्याच ठिकाणी पंचनामे झालेले नाहीत. तर पोलीस भरतीचाही घोळ कायम आहे. तसेच, काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे निघाले. जिल्ह्यातील प्रश्न आम्ही बोलायचे कोणासोबत? साधारण जिल्ह्याची पूरपरिस्थिती पाहता, सोयाबिन, कापसासंदर्भात मी पालकमंत्र्यांना वारंवार फोन करतोय, त्यांच्या ओएसडींना फोन केला, पण काहीच उपयोग झालेला नाही."    


हेही वाचा:


Amol Mitkari on Vikhe Patil: विखे पाटील 'ऑनलाईन पालकमंत्री'; त्यांच्याऐवजी भाजपच्या या आमदाराला पालकमंत्री करा; अमोल मिटकरींची मागणी