Maharashtra Politics : अकोला : महायुतीतील (Mahayuti) धुसफूस पुन्हा एकदा समोर आली आहे. राज्याचे महसूलमंत्री आणि अकोल्याचे (Akola) पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhepatil) वेळ देत नसल्याची आणि फोन उचलत नसल्याची तक्रार राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केली आहे. राधाकृष्ण विखे पाटलांसह त्यांच्या कोणत्याच ओएसडी आणि स्विय सहायकांनी फोन घेतले नसल्याचंही अमोल मिटकरी यांनी सांगितलं आहे. तसेच, पुढे बोलताना विखे पाटील हे 'ऑनलाईन पालकमंत्री' असल्याची टीकाही अमोल मिटकरी यांनी केली आहे. त्याचप्रमाणे, गेल्या सहा महिन्यांपासून पालकमंत्री अकोल्यात फिरकले नाहीत. 


जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विखे पाटील ऑनलाईन राहणार उपस्थित होते. जिल्ह्यातील प्रश्न, पूर परिस्थिती यावर चर्चा करण्यासाठी मिटकरींनी विखे पाटलांना फोन केला होता. मात्र, अनेक प्रयत्न करुनही त्यांचा मंत्री विखे पाटलांशी संपर्क झाला नसल्याचं त्यांनी सांगितलं. 


विखे पाटील, गिरीष महाजन, रविंद्र चव्हाण, सुरेश खाडे या मंत्र्यांसंदर्भात असाच अनुभव आल्याची तक्रार अमोल मिटकरींनी केली आहे. विखे पाटलांची तक्रार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचंही अमोल मिटकरी यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. अकोल्यात भाजपचे आमदार रणधीर सावरकरांना पालकमंत्री करा, अशी मागणीही अमोल मिटकरी यांनी केली आहे. 


अमोल मिटकरी बोलताना म्हणाले की, "अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे महसुलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आहेत. गेल्या सहा महिन्यांत अकोला जिल्ह्यातील वेगवेगळ्या घटना पाहता, राधाकृष्ण विखे पाटील स्वतः अजिबात उपस्थित राहिले नाहीत. मागची जिल्हानियोजन बैठक होती, त्यावेळीही ते व्हिसीद्वारे उपस्थित होते. गेल्या आठ दिवसांपासून अकोल्यातील शेतकऱ्यांसंदर्भातील विषय फार महत्त्वाचे असल्याचं पाहायला मिळत आहे. संबंध जिल्ह्यात भरपूर पाऊस आहे. बऱ्याच ठिकाणी पंचनामे झालेले नाहीत. तर पोलीस भरतीचाही घोळ कायम आहे. तसेच, काल जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे निघाले. जिल्ह्यातील प्रश्न आम्ही बोलायचे कोणासोबत? साधारण जिल्ह्याची पूरपरिस्थिती पाहता, सोयाबिन, कापसासंदर्भात मी पालकमंत्र्यांना वारंवार फोन करतोय, त्यांच्या ओएसडींना फोन केला, पण काहीच उपयोग झालेला नाही."                                                       


दरम्यान, फेसबुकवाले, ऑनलाईन मुख्यमंत्री अशी टीका आम्ही उद्धव ठाकरेंवर करायचो. अशा परिस्थितीत आमचाच पालकमंत्री 'ऑनलाईन' पालकमंत्री असल्यानं आम्हाला उद्धव ठाकरेंवर टीका करण्याचा अधिकार कसा राहील.