Ajit Pawar, Parbhani : "गावकी आणि भावकीची ही निवडणूक नाही. या अँगलनेच आपण निवडणूक लढली पाहिजे. गेल्या वेळी निवडून दिलं त्यांनी काय दिवा लावला? समाजासाठी, राज्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. या दृष्टीने आपण काम करतोय. एखाद खोपटं असलं तर महादेव जानकर तिथेही झोपू शकतात. सकाळी तिथेच भाकरी खाऊन कामाला लागू शकतात. ते देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते. तरी देखील बारामतीमध्ये आल्यानंतर लोक सांगायची महादेव जानकर आमच्यामध्ये राहतात. आमच्या इथे झोपतात, असा उमेदवार महायुतीने परभणी लोकसभा मतदारसंघात दिला आहे", असं उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. परभणीत (Parbhani ) महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ महायुतीची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. परभणीतील सभेला गृहमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. 


प्रत्येकाला निवडणूक लढवण्याची इच्छा असते


अजित पवार म्हणाले, युगपुरुष शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केलं. हे आपल्याला कधीही विसरता येणार नाही. नाकारताही येणार नाही. उद्याच्या काळात देशातील 543 ठिकाणी निवडणूक होणार आहे. पण महाराष्ट्रात 48 जागांच्या निवडणूका आहेत. महायुतीच्या नेत्यांनी ठरवलं की, निवडणुकीला उमेदवार देताना वेगवेगळ्या जातींना प्रतिनिधीत्व द्यायचे. शेवटी हे राज्य बहुजनांचे आहे. प्रत्येकाला निवडणूक लढवण्याची इच्छा असते. ते काही चुकीचे नाही. तो त्यांचा अधिकार आहे. त्यांचा हक्क आहे. मात्र, एकदा महायुतीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे, असं म्हटलं पाहिजे.


 फक्त 25 दिवस तुमच्या हातात राहिले आहेत 


पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, मित्रांनो 26 तारखेला मतदान आहे. फक्त 25 दिवस तुमच्या हातात राहिले आहेत. फार इर्षेने तुम्हा सर्वांना काम करावे लागेल. प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचे काम उमेदवार करु शकत नाही. 1991 मध्ये मीही बारामतीमधून खासदार झालो होतो. त्यामुळे महायुतीतील सर्व पक्षांनी आणि कार्यकर्त्यांनी आपली निवडणूक म्हणून लढायचं आहे. तुम्ही विकासाबद्दल कोणतीही काळजी करु नका. परभणीतील रस्त्यांसाठी पुढील काम केले जाईल. महादेव जानकर यांना निवडून द्या आणि मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा. रस्ते, मेडिकल कॉलेज अशा अनेक गोष्टी करण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत. त्याबद्दल आपण काळजी करु नका. मी, एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजी कोठेही कमी पडणार नाहीत, असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला. 


रझाकारांशी मराठवाड्यातील एका पिढीने संघर्ष केला


मराठवाडा संतांची भूमी आहे. रझाकारांशी मराठवाड्यातील एका पिढीने संघर्ष केला. ज्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामात बलिदान दिलं, त्यांनाही मी आज अभिवादन करतो. महादेव जानकर यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ते सर्वसामान्य समाजाचे आणि शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देणार नेतृत्व आहे. बहुजन समाजाला सोबत घेऊन जाण्याची महायुतीची भूमिका आहे. यशवंतराव चव्हाण यांची शिकवण आम्ही सर्वांनी अवलंबली आहे, असंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं. 




इतर महत्वाच्या बातम्या 


मोठी बातमी : श्रीकांत शिंदेंच्या विरोधातील ठाकरे गटाचा उमेदवार ठरला?, थेट ट्वीटवरून घोषणा