मुंबई : Eknath Shinde Notice To Sanjay Raut : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना शिवसेनेनं नोटीस बजावली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने त्यांच्या वकिलामार्फ संजय राऊतांना ही मानहानीची नोटीस पाठवण्यात आली आहे. तीन दिवसांत माफी मागा, अन्यथा कारवाईला सामोरे जा, असा इशाराच या नोटीसमधून देण्यात आला आहे. दरम्यान, सामनामधील रोखठोकमधून संजय राऊतांनी मुख्यमंत्री शिंदेंवर (Eknath Shide) आरोप केले होते. त्याचसंदर्भात ही नोटीस पाठवण्यात आल्याचं संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. तसेच,  इसे कहते है ऊलटा चोर कोतवाल को डाटे।, असे म्हणत ही नोटीस पॉलिटीकल फनी डॉक्युमेंट असल्यांचही राऊत यांनी म्हटलं आहे.


शिवसेना खासदार आणि सामना वृत्तपत्राचे संपादक असलेल्या संजय राऊत यांनी रविवारी शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून रोखठोक भूमिका मांडली होती. यावेळी, त्यांनी राज्यातील लोकसभा निवडणुकांवर भाष्य करताना, महायुतीमध्ये आलबेल नसल्याचं म्हटलं. तसेच, लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एकही उमेदवार निवडून येऊ नये, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कटकारस्थान केल्याचा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यावरुन, राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली होती. गांजा पिऊन लेख लिहिणाऱ्यांवर मी बोलत नाही, असे फडणवीस यांनी म्हटले होते. त्यानंतर, आता एकनाथ शिदेंकडून संजय राऊत यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. 


संजय राऊत यांनीही नोटीसवर बोलताना म्हटले की, गैरसंविधानिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला एका कायदेशीर नोटीस बजावली आहे. अतिशय मनोरंजक आणि अनेक हास्यास्पद राजकीय दस्तावेजांपैकी हा एक म्हणत संजय राऊत यांनी या नोटीसची खिल्ली उडवल्याचंही दिसून येत आहे. तसेच, अब आयेगा मजा.. असेही राऊत यांनी नोटीसंदर्भात प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. 




काय म्हणाले होते लेखात


संजय राऊत यांनी सामनामधील रोखठोक सदरातून मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले होते. एकनाथ शिंदेंनी अजितदादांविरोधात कारस्थाने केल्याचा आरोप करण्यात आला असून महाराष्ट्राच्या राजकारणात आलेल्या या समृद्धीने अनेकांचे डोळे दिपले. विचारांवर चालणारा महाराष्ट्र निवडणूक पैशांच्या धुरळ्यावर चालला. लोकांनी पैसे घेतले भ्रष्टाचारातून निर्माण झालेले सरकारने शेवटी जनतेला भ्रष्ट केले, असा आरोप राऊत यांनी रोखठोक सदरातून केला आहे.  एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीत पैशाचा अफाट वापर केला. प्रत्येक मतदारसंघात त्यांनी किमान 25 ते 30 कोटी रुपये वाटले. पुन्हा अनेक उमेदवार पाडण्यासाठी वेगळे बजेट. अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे व त्यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे.