मुंबई : लोकसभा निवडणुकीत घवघवतीत यश मिळाल्यानंतर काँग्रेसने आता विधानसभा निवडणुकांची तयारी केली आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana patole) यांच्या नेतृत्वात लोकसभेला काँग्रेस पक्षाला तब्बल 13 जागांवर विजय मिळाला. गत 2019 च्या तुलनेत काँग्रेस 1 जागेवरुन 13 जागेवर पोहोचल्याने पक्षश्रेष्ठींची मर्जी राखण्यातही नाना पटोले यांना यश मिळालं आहे. त्यामुळे, विधानसभा (Vidhansabha) निवडणुकांही काँग्रेसने नाना पटोले यांच्याच नेतृत्वात निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निवडणुका महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढल्या जाणार आहेत. त्यामुळे, महाराष्ट्रातील 288 विधानसभेच्या जागांवर काँग्रेस, शिवसेना ठाकरे व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात वाटाघाटी होणार आहे. काँग्रेसने (congress) महाविकास आघाडीतील (Mahavikas aghadi) या समन्वयासाठी 10 जणांची समिती नेमली आहे. तर, मुंबईसाठी या समितीत 3 नेत्यांना स्थान देण्यात आलं आहे. 


काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या आदेशान्वये महाविकास आघाडीत जागा वाटपासाठी काँग्रेसने 10 सदस्यांची समिती गठीत केली आहे. त्यामध्ये, महाराष्ट्रातील जागावाटपासाठी 7 जणांची तर मुंबईसाठी तिघांना स्थान देण्यात आलं आहे. आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीची महाविकास आघाडी आहे. त्यामुळे, महाविकास आघाडीत तिन्ही पक्षांच्या जागावाटपाचे सुत्र ठरवण्यासाठी राजकीय पक्षांचे प्रमुख नेते पुढाकार घेणार आहेत. काँग्रेस हा राष्ट्रीय पक्ष असल्याने या चर्चांसाठी दिल्लीतून वरिष्ठ नेते प्रत्यक्ष दरवेळी येऊ शकत नाही. त्यामुळेच, काँग्रेसने महाराष्ट्रात 10 नेत्यांची समिती नियुक्त केली आहे. त्यामध्ये, जुन्या व वरिष्ठ नेत्यांना संधी देण्यात आली आहे. तर, मुंबईसाठी मुंबईतील तीन प्रमुख नेत्यांचाही या समितीत समावेश करण्यात आला आहे. 


सतेज पाटील यांना स्थान, सुशीलकुमार शिंदेंना नाही


आगामी विधानसभा निवडणुकांत महाविकास आघाडीत प्रदेश जागा वाटपांच्या चर्चेसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील , नसीम खान, नितीन राऊत यांना स्थान देण्यात आले आहे. तर मुंबईच्या जागा वाटपासाठी वर्षा गायकवाड, भाई जगताप आणि अस्लम शेख यांचा समावेश समितीत आहे. त्यामुळे, काँग्रेसकडून आगामी विधानसभा निवडणुकांची रणनीती आखण्यास सुरुवात झाल्याचं दिसून येत आहे. दरम्यान, या समितीमध्ये ज्येष्ठ नेत्यांपैकी सुशील कुमार शिंदे यांना स्थान देण्यात आलं नाही, तर युवा नेत्यांपैकी चर्चेत असलेल्या काँग्रेसच्या विश्वजीत कदम यांनाही स्थान मिळालं नाही. मात्र, कोल्हापूरच्या विजयात महत्वाचा वाटा असणाऱ्या माजी मंत्री सतेज पाटील यांना 10 जणांच्या समितीत स्थान मिळाले आहे. 




हेही वाचा


पांडुरंगची प्रक्षाळपूजा... 20 दिवसानंतर बा विठ्ठलास आराम, भक्तांसाठी तोही रात्रंदिवस उभाच राहिला