नाशिक : एकीकडे विधानपरिषदेच्या सुरु झालेली उलथापालथ आणि त्यानंतर महाविक आघाडीतील बाहेर येत असलेली खदखद पाहता आघाडीतील तिन्ही पक्षांनी स्वतंत्र बैठक बोलावली असल्याचे समजते. या पार्श्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ त्र्यंबकचा कार्यक्रमाला उपस्थित न राहता थेट मुंबईकडे रवाना झाले आहेत.


सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष लागून असलेल्या विधानपरिषद निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला कात्रजचा घाट दाखवला. या निवडणुकीतही अपक्षांनी भाजपचे 'लाड' पुरवले आणि शेवटी देवेंद्र फडणवीस गेम फिनिशर ठरले.


दरम्यान विधानपरिषद निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील अंतर्गत धुसफूस बाहेर येत आहे. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे शिवसेना नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत चाललंय काय? असा प्रश्न सध्या उपस्थित होत असून याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा महाविकास आघाडी टिकवण्यासाठी त्या त्या पक्षांनी स्वतंत्र बैठक बोलावल्याचे समजते.


त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक बोलावली असल्याचे समजते. त्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ त्र्यंबकला न जाता थेट मुंबईला रवाना झाले आहेत. त्यामुळे इतक्या तातडीने भुजबळ रवाना झाल्याने राष्ट्रवादीत तर काही धुसफूस नाही ना? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.


नियोजित कार्यक्रम रद्द
मुंबईत हालचालींना वेग आला असून एकनाथ शिंदे यांच्या नॉट रिचेबल असल्यामुळे आघाडी सरकार बुचकळ्यात पडले आहे. या पार्श्वभूमीवर तिन्ही पक्षांनी बैठक बोलावली आहे. यासाठी मंत्री छगन भुजबळ तातडीने मुंबईकडे रवाना झाले असून नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.


संबंधित बातम्या