Nashik Lok Sabha Constituency : नाशिक लोकसभा मतदारसंघ गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यभर चर्चेत आला आहे. कारण महायुतीत (Mahayuti) नाशिकच्या जागेवरून अनेक दिवसांपासून जोरदार रस्सीखेच सुरु आहे. नाशिकच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासही सुरुवात करण्यात आली आहे. मात्र अजूनही महायुतीत नाशिकच्या जागेसाठी उमेदवार ठरलेला नाही. दररोज नवनवीन इच्छुकांची नावे समोर येत आहेत. महायुतीतून शांतीगिरी महाराज (Shantigiri Maharaj) देखील नाशिक लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते. 


शांतीगिरी महाराजांनी नाशिक लोकसभेचे महायुतीतून तिकीट मिळण्यासाठी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची भेट घेतली होती. मात्र त्यांचे नाव मागे पडले. त्यानंतर त्यांनी महाविकास आघडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांशीदेखील चर्चा केली होती. मात्र महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने राजाभाऊ वाजे (Rajabhau Waje) यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतर शांतीगिरी महाराजांनी अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. मात्र शांतीगिरी महाराजांना नेमकी नाशिकची निवडणूक का लढवायची आहे? हे जाणून घेऊयात...


शांतीगिरी महाराजांचा लाखोंचा भक्त परिवार


शांतीगिरी महाराज यांचा लाखोंचा भक्त परिवार असून देशात त्यांचे सुमारे 115 आश्रम आहेत. तसेच हजारो विद्यार्थ्यांना शांतीगिरी महाराजांच्या माध्यमातून सात गुरुकुलात धार्मिक शिक्षण देण्याचे कार्य केले जाते. अनुष्ठानाच्या माध्यमातून शांतीगिरी महाराजांनी व्यसनमुक्तीसाठी मोठं कार्य केलंय. त्यांना मौनीगिरी महाराज म्हणून देखील ओळखले जाते. शांतीगिरी महाराजांनी या आधी 2009 मध्ये छत्रपती संभाजीनगरमधून निवडणूक लढवली होती. शांतीगिरी महाराजांच्या उमेदवारीमुळे शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना चांगलाच फटका बसल्याचे दिसून आले होते. शांतिगिरी महाराजांचा या निवडणुकीत थोडक्यात पराभव झाला होता. खैरेंच्या विजयाचा फरक अवघ्या 32 हजार मतांवर होता. 


शांतीगिरी महाराज नेमकी का लढताहेत नाशिकची निवडणूक? 


या निवडणुकीच्या अनुभवाची शिदोरी आणि जय बाबाजी भक्त परिवाराच्या आग्रहामुळे शांतीगिरी महाराज हे पुन्हा एकदा नाशिकची लोकसभा लढवत आहेत. शांतीगिरी महाराजांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा करताच  नाशिक ही संतांची भूमी आहे. या भूमीतून रामराज्य आणण्यासाठी निवडणूक लढविणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार शांतीगिरी महाराजांकडून जोरदार तयारी केली जात आहे. 


शांतीगिरी महाराजांनी पंतप्रधान मोदींसारखेच केले अनुष्ठान


शांतीगिरी महाराजांनी नाशिक लोकसभा निवडणुकीची घोषणा केल्यानंतर तब्बल आठ दिवसांचे अनुष्ठान केले.  यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) केदारनाथला अनुष्ठान करत निवडणुकीची प्रक्रिया पार पाडली होती. शांतीगिरी महाराजांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमाणेच अनुष्ठान करत निवडणुकीसाठी दंड थोपटले. आज ते अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. नाशिकमध्ये आपल्या भक्तपरिवारासह  शांतीगिरी महाराजांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे. शांतिगिरी महाराज यांच्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीला तगडे आव्हान निर्माण झाले आहे. नाशिकच्या निवडणुकीत नेमकी कोण बाजी मारणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.   


आणखी वाचा 


Shantigiri Maharaj : सफारी, SUV सह 9 गाड्यांचा ताफा, 53 ठिकाणी जमीन आणि कोट्यवधींची संपत्ती; आजन्म ब्रह्मचारी असलेल्या शांतीगिरी महाराजांची संपत्ती किती?