Maharashtra Nashik News: शाहू महाराज यांच्याविषयी वेदोक्त प्रकरण चांगलेच गाजले होते. त्यावेळी महाराजांनी धार्मिक क्रिया पुराणेक्त विधिनुसार न करता वैदिक विधिनुसार करण्याचा आदेश काढला. त्यावेळी अनेक रोषांना सामोरे जावे लागले होते. आता शाहू महाजांच्या वंशज संयोगिताराजे छत्रपती (Sanyogeetaraje Chhatrapati) यांच्या एका सोशल मीडिया (Social Media Post) पोस्टवरून हा वाद पुन्हा निर्माण झाला आहे. 


देशभरात काल रामनवमीचा उत्सव (Ram Navami 2023) साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर संयोगिताराजे छत्रपती यांनी नाशिकच्या काळाराम मंदिरास (Nashik Kalaram Mandir) भेट दिली. यावेळी त्यांनी मंदिरात पूजा केली, यावेळी महंतांनी ही पूजा पुराणेक्त पद्धतीने करण्यास सुरुवात केली. यास संयोगिताराजे छत्रपती यांनी विरोध दर्शवत वैदिक पद्धतीने मंत्र म्हणण्यास सांगितले. हा सगळा प्रकार संयोगीता राजे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 


काही दिवसांपूर्वी काळाराम मंदिरात पूजा करताना मंदिरातील तथाकथित महंतांनी 'पुराणातील मंत्र म्हणण्याचा प्रयत्न केला. मात्र, छत्रपती शाहू महाराज यांच्या घराण्यातील असल्याने मी त्यास विरोध दर्शवला. मात्र वेदोक्त मंत्र म्हणण्याचा अधिकार तुम्हाला नाही असे महंतांनी सांगितले, अशा आशयाची सोशल मीडिया पोस्ट संभाजीराजे छत्रपती यांच्या पत्नी संयोगिताराजेंनी रामनवमीच्या दिवशी केल्याने चर्चांना एकच उधाण आले आहे.






दरम्यान, संयोगिताराजे यांनी केलेल्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे की, मी मंदिरात महामृत्युंजय मंत्र म्हटला. मंदिरातील महंतांनी पूजेसाठी पुराणातील मंत्र म्हटले. मात्र शाहू महाराजांनी कर्मकांडाला विरोध केल्याने आणि आपण त्या घराण्याचा वारसा चालवत असल्याने त्यास विरोध केला. या वेळी मात्र महंतांनी तुम्हाला वेदोक्त मंत्र म्हणण्याचा अधिकार नाही असे स्पष्ट केले. मात्र यास न जुमानता मी या ठिकाणी महामृत्युंजय मंत्र, रामरक्षा पठण केले. त्यावेळी त्यांना सांगितले ज्या मंदिरात आपण आजच्या काळातही नियम लावत आहात, ती मंदिरे वाचवली कोणी? छत्रपतींनी वाचवली! मग छत्रपतींना शिवकण्याचे धाडस करू नका, अशा शब्दांत पोस्टद्वारे इशारा दिल्याचे दिसत आहे. दरम्यान, या प्रकाराबाबत कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याचे काळाराम मंदिराच्या विश्वस्तांकडून सांगण्यात आले.


शाहू महाराज वेदोक्त प्रकरण काय? 


धार्मिक क्रिया पुराणोक्त विधीनुसार न करता त्या फक्त वैदिक विधी नुसारच करण्यात याव्यात असा आदेश शाहू महाराज यांनी काढला होता. यास नारायणराव राजोपाध्ये यांनी फेटाळले. त्यावर शाहू महाराजांनी नारायणराव राजोपाध्ये यांना कुलपुरोहित या पदावरून काढून टाकत जमिनी सरकार जमा करण्यात आल्या. हा वाद वाढत जाऊन थेट ब्रिटिश सरकारकडे गेला. मात्र ब्रिटिश सरकारने राजोपाध्ये यांना सुनावले. मात्र त्यानंतरही वाद चिघळत राहिला. शेवटी करवीर धर्मपीठाचा वेदोक्त प्रकरणी निर्णय झाला. यात ते म्हणतात की, छत्रपती शाहू महाराज यांचे घराणे क्षत्रिय असून वेदोक्त कर्म करण्यास काही हरकत नसल्याचे म्हटले आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


नाशिकच्या काळाराम मंदिरास नाव कसं पडलं? काय आहे पंचवटीचा इतिहास?