नाशिक : संपूर्ण राज्यात यंदा पावसाने पाठ (Rain) फिरवल्याने पिण्याच्या पाण्याच्या सोबत शेतीच्या पाण्याचा मोठा प्रश्न येत्या काही महिन्यांत निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. नाशिक विभागाच्या पाचही जिल्ह्यांत नाशिक (Nashik) जिल्हा हा सुजलाम्-सुफलाम् म्हणून ओळखला जातो. मात्र यंदा भर पावसाळ्यामध्ये नाशिक विभागामध्ये नाशिक जिल्ह्यातील 213 गावे आणि वाड्यांना सर्वाधिक 81 टँकरद्वारे (Water Tanker) पाणीपुरवठा केला जात आहे.


गेल्या आठवड्यात गुरुवारी आणि शुक्रवारी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. यामुळे नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली, त्या पावसामुळे स्थानिक स्तरावर पाण्याची उपलब्धता होईल आणि काही टँकर बंद होतील, अशी आशा होती. तरी ग्रामीण भागात पाणी पुरवणाऱ्या टँकरची संख्या कमी होऊ शकली नाही. त्या पावसामुळे स्थानिक पातळी पाणी उपलब्धतेचा प्रश्न सुटलेला नसल्याने जिल्ह्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरु ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात पाणीटंचाईची झळ तीव्र होत असून टँकरची गरज भासणाऱ्या गावांची संख्याही वाढली आहे. त्यामुळे पुरेसा पाऊस न झाल्यास जिल्ह्यात दुष्काळाची (Nashik Drought) दाहकता वाढण्याची भीती व्यक्त होत असून नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत सध्या 213 गावांना 81 टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. 


नाशिक जिल्ह्यात (Nashik District) 15 पैकी सात तालुक्यांची भिस्त टँकरवरच असून पाणीटंचाईच्या सर्वाधिक झळा येवला आणि नांदगाव या दोन तालुक्यांना बसत आहेत. येवलात सर्वाधिक 22 तर नांदगावात 18 टँकर धावत आहेत. या तालुक्यांमध्ये 49 आणि 74 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नाशिक जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यानुसार 16 आणि 17 सप्टेंबरला येलो अलर्ट असून हा अंदाज खरा ठरल्यास शेतीसह धरणांमधील पाणी पातळी वाढण्यास मदत होऊ शकेल. धुळे आणि नंदुरबारमध्ये उद्यापासून सलग तीन दिवस मध्यम स्वरुपाचा, तर अहमदनगर जळगावमध्ये येलो जारी करण्यात आला आहे. 


सर्वाधिक टँकर नाशिकमध्ये


नाशिक जिल्ह्यात यंदा कुठेच पुरेसा समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यातही येवला, चांदवड या कायमच्या कमी पावसाच्या तालुक्यांमध्ये तर पाऊस अत्यल्प झाला आहे. जिल्ह्यातील 91 गावे आणि 110 वाड्या असे एकूण 201 ठिकाणी 78 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात गावांसाठी 25 व टँकरसाठी 17 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात सात गावे-वाड्यांमध्ये तीन, चांदवड तालुक्यात 34 टँकर, मालेगाव तालुक्यातील गावे-वाड्यांसाठी 16 टँकर, नांदगाव तालुक्यातील गावे-वाड्यांसाठी 9 टँकर, सिन्नर तालुक्यातील दोन वाड्यांसाठी 2, येवला तालुक्यातील 49 गावे वाड्यांसाठी 22 अशा एकूण 213 गावे व वाड्यांना सर्वाधिक 81 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.


इतर महत्वाची बातमी : 


Nashik News : गंगापूर धरण 95 टक्के, दोन धरणे अजूनही शून्यावर; नाशिक जिल्ह्यात खरिपाचा हंगाम वाया जाण्याची भीती