Nashik News : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडला असून गेल्या कित्येक दिवसापासून कांद्याचं करायच काय हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. लाल कांदा सध्या बाजारामध्ये येतोय. मात्र या कांद्याला कवडीमोल रुपयांपर्यंतचा भाव मिळत आहे. अशातच नाशिकच्या एका शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांना (Eknath Shinde) रक्ताने पत्र लिहत अग्निडाग कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे.


नाशिक जिल्ह्यात कांद्याचे भाव (Onion rate) पुन्हा पडले असून दोनच दिवसांपूर्वी याबाबत शेतकऱ्यांनी आंदोलन (Farmers Protest) केले होते. सततच्या घसरत्या भावामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कांदा कवडीमोल भावात विकला जात असल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही भरून निघत नाही. तीन दिवसांपूर्वी चांदवड तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचा उद्रेक बघायला मिळालेला होता. शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये लिलाव संपूर्णपणे बंद पडलेले होते. त्यानंतरही कुठल्याही स्वरूपाची सरकारने दखल घेतली नाही. येवल्याच्या नगरसुल येथील शेतकरी कृष्णा डोंगरे (Krushna Dongre) यांनी थेट आपल्या रक्ताने पत्र लिहिले असून कांदा अग्निडाग समारंभ आयोजित करून मुख्यमंत्र्यांना आमंत्रण दिले आहे. 


कांदा उत्पादनात अग्रेसर असलेल्या नाशिक जिल्ह्यात अनेक अडचणींवर मात करत शेतकऱ्यांनी कांद्याचे उत्पादन घेतले. मात्र सध्या (Onion) कांद्याच्या दरात घसरण होत असल्याने शेतकरी त्रस्त झाला आहे. दरम्यान येवला येथील शेतकरी कृष्णा डोंगरे याने कांदा अग्निडाग समारंभाचे आयोजन केले आहे. याची निमंत्रणपत्रिका मुख्यमंत्र्यांच्या नावे व्हायरल होत असून पत्रिकेद्वारे निमंत्रण दिले आहे. यात त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना उद्देशून म्हटले आहे की, शेतकऱ्यांपुढे अनेक प्रश्न असताना त्याला कांदा रडवतो आहे. कांदा एवढ्या कमी दरात जात असल्याने उत्पादन खर्च वसूल होत नसून केंद्रातील भाजपाचे धोरण शेतकरीविरोधी आहे. आपण शेतकऱ्याचे पुत्र असून या विरोधात आवाज उठवणे आवश्यक आहे. मात्र आपणही गप्प का? असा प्रश्न त्याने मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्राद्वारे विचारला आहे. आपण काही करु शकत नसाल तर आयोजित केलेल्या कांदा अग्नीडाग कार्यक्रमास आवर्जून उपस्थित रहावे असे आवाहन या पत्राद्वारे केले आहे. 


कांदा अग्निडाग समारंभ... 


दरम्यान कांद्याला भाव मिळत नसल्याने कृष्णा डोंगरे याने येत्या 6 मार्च रोजी कांदा अग्निडाग समारंभ आयोजित केला आहे.  यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनादेखील निमंत्रण दिले आहे. येवला तालुक्यातील नगरसूल जवळील मातुलठाण या गावी समारंभाचे ठिकाण आहे. सदर कार्यक्रमाच्या जाहीर निमंत्रण पत्रिका छापल्या असून सोशल मिडीयावर सध्या व्‍हायरल होत आहेत. विशेष म्हणजे काही वर्षापुर्वी याच कांदा प्रश्नावर कृष्णा डोंगरे यांनी कांद्याचे शेत जाळून टाकलं होते. त्यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट नगरसुल येथे धाव घेत कृष्णा डोंगरे यांची भेट घेतली होती.