Nashik News : एकीकडे शासन आपल्या दारी सारख्या इव्हेंटमधून दारोदारी सरकारी योजना पोहचवण्याचा दावा करत असताना दुसरीकडे आदिवासी पाड्यांमध्ये (Trible Villages) मात्र आजही रस्त्याअभावी आदिवासी बांधवाना जीव गमवावा लागत आहे. पेठ, धुळे, पालघरच्या दुर्दैवी घटनेनंतर आता इगतपुरी तालुक्यात संतापजनक घटना समोर आली आहे. इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील जुणवणेवाडी येथील गरोदर महिलेला रस्ता नसल्याने डोली करून दवाखाण्यात नेत असताना मृत्यू (Death) झाल्याची घटना घडली आहे. 


'शासन आपल्या दारी, रस्त्यांसाठी खर्च, गाव तेथे काँक्रीट रस्ते अशा वल्गना करणाऱ्या प्रशासनाचे दावे फोल ठरत असल्याचे उघड झाले आहे. प्रसूतिवेदना सहन करणाऱ्या महिलेच्या मृत्यूनंतर झोळी करून तिचा मृतदेह तीन किलोमीटरचा प्रवास करत घरी न्यावा लागल्याची धक्कादायक घटना इगतपुरी तालुक्यात घडली. जुनवणेवाडी येथील वनिता भावडू भगत या महिलेला प्रसूतिवेदना सुरू झाल्या. नातेवाईकांनी पहाटे अडीच वाजता अडीच किमी पायी चालत महिलेला तळोघ येथून घोटीला आणले. तिची प्रकृती खालावल्याने तिला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात (Nashik District Hospital) नेण्यात आले. मात्र जिल्हा रुग्णालयात जात असतानाच वाटेत तिचा मृत्यू झाला. दुर्दैवी घटनेत महिलेच्या पोटातील बाळाचाही दुर्दैवी अंत झाला.


रस्त्याची दुरावस्था, पायपीट, सरकारी अनास्था यात झालेल्या विलंबामुळे महिलेला प्राण सोडावा लागल्याचा आरोप होत आहे. घरी नेण्यासाठी देखील सुविधांअभावी मृतदेह झोळीतून घरी नेण्यात आला. या गंभीर घटनेची माहिती मिळाल्यानंतर मुंबई येथे सुरु असलेल्या पावसाळी अधिवेशनात आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) यांनी अतिदुर्गम भागातील रस्त्यांच्या समस्यांचा प्रश्न उपस्थित केला. करोडो रुपयांच्या विकासाचे स्वप्न दाखवणाऱ्या शासनाच्या दृष्टीने घडलेली घटना असल्याची प्रतिक्रिया लाजिरवाणी एल्गार संघटनेचे भगवान मधे यांनी व्यक्त केली.


मरणसुद्धा परवडत नाही... 


जुनवणेवाडीसारख्या अनेक गावात रस्ताच नाही. रस्ता एवढा खराब आहे की, पावसाळ्यात चालणेही मुश्कील होते. तळोघ ग्रामपंचायत हद्दीत जुनवणेवाडी ही आदिवासी वस्ती असून रस्त्यापर्यंत येण्यासाठी गावकऱ्यांना सुमारे तीन किलोमीटरच्या अतिशय कच्च्या सत्याने यावे लागते. पावसामुळे रस्ता सध्या चिखलमय झाला आहे. अशावेळी कुणाचे मरणसुद्धा या लोकांना परवडत नाही. करोड़ों रुपयाच्या विकासाचे स्वप्न दाखवणाऱ्या शासनाच्या दृष्टीने ही लाजिरवाणी घटना असून या गावात तातडीने रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. एकीकडे आदिवासी बांधवासाठी कोट्यवधी रुपयांच्या योजना असताना केवळ रस्त्यांअभावी त्यांना जीव गमवावा लागत असल्याची लाजिरवाणी असून, या घटनांमुळे संताप व्यक्त केला जात आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Dhule Shirpur : अन् या झोळीत देशाचं भविष्य! धुळ्यात गर्भवती महिलेला झोळीत घालून सहा किलोमीटरची पायपीट