Harshvardhan Sapkal on Nashik Crime: 9 महिन्यात 44 खून अन्..., फडणवीसांनी कायदा-सुव्यस्थेला हरताळ फासला, महाजन पिस्तुल्या; नाशिकच्या गुन्हेगारीवरून हर्षवर्धन सपकाळांनी सगळंच काढलं
Harshvardhan Sapkal on Nashik Crime: नाशिकमध्ये गेल्या नऊ महिन्यांपासून खुनाचे सत्र सुरूच आहे. यावरून हर्षवर्धन सपकाळ यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह गिरीश महाजनांवर घणाघाती टीका केलीय.

Harshvardhan Sapkal on Nashik Crime: नाशिकसारखं (Nashik) शांत आणि सुरक्षित मानलं जाणारं शहर सध्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे हादरून गेलं आहे. गेल्या नऊ महिन्यांत 45 हून अधिक खून झाल्याची नोंद आहे. नुकतेच नाशिकमध्ये एकाच दिवसात तीन खुनाच्या घटना घडल्या आहेत. यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील वाढती गुन्हेगारी ही नाशिककरांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. आता या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
Harshvardhan Sapkal on Nashik Crime: फडणवीसांनी कायदा-सुव्यस्थेला हरताळ फासला
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नाशिक येथे पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केलंय. यावेळी नाशिकमधील वाढत्या गुन्हेगारीबाबत विचारले असता ते म्हणाले की, कायदा-सुव्यवस्थेला देवेंद्र फडणवीस यांनी हरताळ फासला आहे. नाशिकला पालकमंत्री नाहीत. कुंभमेळ्याचे मोठे ठेके मोठ्या कंत्राटदारांना देण्यात येत आहे. पिस्तुल्या म्हणून ज्याची ओळख आहे. जे स्वतःला संकटमोचक म्हणतात ते गिरीश महाजन केवळ येथे झेंडावंदन करताय. पूर्वी नाशिक सुसंस्कृत होते. नाशिकचे ड्रग्सचे गुजरात कनेक्शन आहे. त्याचा पर्दाफाश केला पाहिजे. नाशिकच्या नावाला गालबोट लागत आहे. खुनाचे सत्र सुरू आहे. 9 महिन्यात 44 खून नाशिकमध्ये झाले आणि 45 वा खून लोकशाहीचा केला आहे. सत्ताधाऱ्यांनी सांभाळलेली पिल्लावळ याला कारणीभूत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
Harshvardhan Sapkal on Devendra Fadnavis: मुख्यमंत्री आहेत की डमरू वाजवणारे गारुडी
महाराष्ट्रात अतिवृष्टीने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने 31 हजार 628 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. याबाबत विचारले असता हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, गारपीट, वादळ, वाऱ्यापासून या हंगामाची सुरुवात झाली. अतिवृष्टीची झळ शेतकऱ्यांना बसली आहे. मायबाप सरकार म्हणून सरकारने काही केले नाही. शेतजमीन खरडुन जाणे, नुकसान होणे त्यावर 50 हजार मदत करा ही काँग्रेसची मागणी आहे. पण सरकार काही करत नाही. उत्कृष्ट रमी बहाद्दर यांनी याची सुरुवात केली. सरकार क्रूरपणे शेतकऱ्यांशी वागत आहे. परवा जे पॅकेज जाहीर केले ती फसवणूक केली आहे. कोणतेही पॅकेज नाही. काल पंतप्रधान आले होते, त्यामुळे शेतकरी सळो की पळो करून सोडतील म्हणून त्यांनी घाईघाईत पॅकेज जाहीर केले. मुख्यमंत्री आहेत की डमरू वाजवणारे गारुडी आहेत, अशी टीका त्यांनी केली.
आणखी वाचा























