नंदुरबार: गुजरात-मध्यप्रदेशचा सीमावर्ती भाग आणि उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा बैल बाजार अशी ख्याती असलेल्या अक्कलकुवा येथील बाजार गर्दीने फुलल्याचं दिसून येतंय. अक्कलकुवा येथील कालिका मातेच्या यात्रा उत्सवाच्या निमित्ताने हा बाजार भरतो. यंदा दोन वर्षाच्या खंडानंतर भरणाऱ्या बैल बाजारात मोठ्या प्रमाणात बैल विक्रीसाठी दाखल झाले असून या खिल्लार ,नागोरी ,गावठी, जातीच्या मोठ्या प्रमाणात आवक होत असते. 


यंदा बैल बाजारामध्ये मोठा उत्साह पाहावयास मिळत आहे. बैलांची मोठ्या प्रमाणात आवक झाली असून खरेदी-विक्रीतून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत असते. शेतकऱ्यांनी आणि व्यापारी या ठिकाणी बैल खरेदीसाठी आणि विक्रीसाठी दाखल झाले आहेत.


बैल बाजारातून होते कोट्यवधी रुपयांची उलाढाल


अक्कलकुवा होणाऱ्या बैलबाजारासाठी दोन हजारापेक्षा अधिक बैलजोड्या येत असतात. या ठिकाणी लाकडी आणि लोखंडी बैलगाड्याही विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. अक्कलकुवा या ठिकाणी होणाऱ्या बैल बाजारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षापासून बाजार बंद असल्याने यावर्षी बैल बाजारात प्रचंड तेजी पाहण्यास मिळत आहे.


गुजरात-मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातून शेतकरी बैल खरेदीसाठी दाखल


गुजरात, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या तिन्ही राज्यांच्या सीमेवरती भरणाऱ्या बैल बाजारात या तिन्ही राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणात येत असतात. या वर्षी बाजारात गावठी बैलांच्या मागणीत प्रचंड वाढ झाली असून त्यांच्या किमती 25 हजारांपासून लाखाच्या घरात आहेत.


ग्रामीण भागात खिल्लार बैलांची  क्रेझ


या सीमावर्ती भागात खिल्लार बैलांना अधिक पसंती दिली जात असल्याचं चित्र आहे. या ठिकाणच्या तरुणांमध्ये खिल्लार बैलांची विशेष आवड असून या जातीच्या बैलांचा वापर हा शर्यतीसाठी केला जातो. 


बैलगाडा शर्यतीवरची सुनावणी पूर्ण, सर्वोच्च न्यायालयाकडून अंतिम निकाल राखून 


सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती (bullock cart race) आणि तामिळनाडूतल्या (Tamil Nadu) जलिकट्टूवर (Jallikattu) बंदीची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी पूर्ण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंबंधिचा निकाल राखून ठेवला आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थकारणावर, लोकसंस्कृतीवर परिणाम करणारा सर्वोच्च न्यायालयाचा हा अंतिम निकाल आता लवकरच जाहीर होईल. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय आता काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 


डिसेंबर 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरची बंदी हटवली होती. या निर्णयाने ग्रामीण महाराष्ट्राला मोठा दिलासा मिळाला होता. मात्र त्यानंतर संबंधित कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्याबाबत आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीकडे बैलगाडा मालकांचे तसेच शर्यत प्रेमींचं लक्ष लागलं आहे. 


ही बातमी वाचा: