नागपूर : राज्यात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. कोरोना बाधितांच्या संख्येतही झपाट्यानं वाढ होत आहे. याचा परिणाम आरोग्य यंत्रणेवर होत असून अपुऱ्या आरोग्य व्यवस्थांमुळे अनेक रुग्णांना आपले प्राणही गमवावे लागत आहेत. नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथील जवाहरलाल नेहरू रुग्णालयात चार कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर एका रुग्णाच्या नातेवाईकाने रुग्णालयाबाहेर तोडफोड करत ऑक्सिजन अभावी या चार रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे.


कन्हान मधील जवाहरलाल नेहरू रुग्णालयात नुकतीच कोरोना बाधित रुग्णांसाठी उपचार व्यवस्था सुरु करण्यात आली होती. वेस्टर्न कोल फिल्ड्स (कोळसा खाण कंपनी) यांच्या या रुग्णालयात कोरोना बाधितांसाठी राज्याच्या आरोग्य विभागाकडून उपचार सेवा दिली जात होती. मात्र सोमवारी रात्री या ठिकाणी 30 आणि 57 वर्षीय दोन पुरुषांचा तर 38 आणि 47 वर्षीय दोन महिलांचा मृत्यू झाला.




सकाळी त्यांच्या मृत्यूची वार्ता समजताच एका महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात तोडफोड करत ऑक्सिजन अभावी या रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप केला आहे. अशातच संतप्त महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयाच्या बाहेरील काच, व्हील चेयर आणि इतर साहित्याची तोडफोड केली आहे. रुग्णालयात कोरोना बाधितांना ऑक्सिजनचा पुरवठा नीट करण्यात आला नाही म्हणून या कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचा आरोप मृत महिलेच्या पतीने केला आहे. 


तर दुसर्‍या बाजूला जवाहरलाल नेहरू रुग्णालय प्रशासनाने मृत महिलेच्या नातेवाईकांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. मृत पावलेले रुग्ण रुग्णालयात दाखल झाले, तेव्हाच त्यांची अवस्था गंभीर होती, ते कोरोनामुळे तीव्र संक्रमित होते, त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा केला गेला, तसेच त्यांच्यावर व्यवस्थित उपचारही करण्यात आले, मात्र तरिही त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत, अशी भूमिका रुग्णालय प्रशासनानं मांडली आहे. रुग्णालय प्रशासनाच्या तक्रारीवर पोलिसांनी एका मृत महिलेच्या पती विरोधात तोडफोडी संदर्भात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर रुग्णालया बाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. 3


महत्त्वाच्या इतर बातम्या :