अमरावती : कोरोना संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढत असल्याने रेमडेसिवीर (Remdesivir) या औषधाची मागणीही वाढत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी हे औषध मिळत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. तर अनेक ठिकाणी या औषधाचा काळाबाजार होत असल्याचेही समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्हाधिकाऱ्यांनी रेमडेसिवीरच्या  मेडीकसमधील थेट विक्रीवर बंदी घातली आहे. 


 रेमडेसिवीर औषधाची कमतरता भासू नये याकरता पुरवठा करणाऱ्या औषध कंपनी यांच्याकडून होणाऱ्या पुरवठा आणि वाटपावर नियंत्रण ठेवण्याकरता अधिकाऱ्याची नियुक्त केली आहे. तसेच थेट औषधविक्रीवर बंदी घालण्यात आली असून औषधाचा पुरवठा स्टॉकीस्टद्वारा केवळ हॉस्पिटल किंवा हॉस्पिटलला संलग्न असलेल्या फार्मसीला करण्यात येणार आहे. 


कोरोना  रुग्णांवरील उपचारासाठी बऱ्याच औषधांचा वापर होत असून प्रामुख्याने रेमडेसिवीर इंजेक्शन हे औषध या आजारावर प्रभावी असल्याचे आढळून आले आहे. राज्यात कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.  त्याचबरोबर रेमडेसिवीर इंजेक्शनची मागणी देखील वाढल्याचे झाल्याचे दिसून आले. सध्या सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयात व औषधी दुकानात रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा संपलेला आहे . इंजेक्शनकरता रुग्णांचे नातेवाईक मोठी धावपळ करीत आहेत. यामुळे रुग्ण गंभीर होत आहेत.


साठा कधी सुरळीत होईल?


राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना रेमडिसवीर इंजेक्शन मिळत नसल्याच्या तक्रारी येवू लागल्यात. सोलापूर, लातूर, उस्मानाबाद औरंगाबाद इथून या तक्रारी येत आहेत.  उस्मानाबाद शहरात सह्याद्रीचा हे खाजगी रूग्णालय आहे. तिथे 16 रूग्णांना इंजेक्शन हवे आहे. पण बाजारात मिळत नाही.  1 मार्चनंतर कोरोना रूग्णांचं प्रमाण वाढलं. २० मार्चला कंपन्यांनी नव्या बॅच सुरु केल्या. 10 तारखेला नव्या व्हायल्स तयार होतील. 12 एप्रिल पासून पुरवठा सुरळीत व्हायला सुरूवात होईल, अशी माहिती समोर येत आहे. 


 कोरोनावरील उपचारात प्रभावी ठरलेल्या  रेमडेसिवीर या औषधाच्या किमतीत कमालीची घट झाली आहे. रेमडेसिवीर इंजेक्शन आता फक्त 900 रुपयांना मिळणार आहे. रेमडेसिवीरची किंमत 2800 रुपये होती.