Dhirendra Shastri VIDEO : भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो; धीरेंद्र शास्त्रींचा माफीनामा, छत्रपती शिवरायांबद्दल केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ न काढण्याची विनंती
Dhirendra Shastri On Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यापासून प्रेरणा घेत आम्ही हिंदू राष्ट्राचा संकल्प केला आहे असं धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटलं.

नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या एका वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर आता बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री (Dhirendra Shastri) यांचा माफीनामा समोर आला आहे. आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला, ज्यांच्यापासून हिंदू राष्ट्राची प्रेरणा घेतली त्यांचा अवमान करण्याचा विचार मनामध्येही येणार नाही असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले. आपल्या वक्तव्यामुळे जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल मनापासून माफी मागतो असंही ते म्हणाले.
नागपूरमधील एका कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदासांसंबंधी एक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर राज्यभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उडाल्याचं दिसलं. धीरेंद्र शास्त्री यांनी आता त्यांच्या वक्तव्यावरुन स्पष्टीकरण देत माफीनामा सादर केला.
Dhirendra Shastri Statement : काय म्हणाले धीरेंद्र शास्त्री?
धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, काही लोकांनी माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला. ज्यांच्या स्वराज्यापासून प्रेरणा घेऊन आम्ही हिंदू राष्ट्राचा संकल्प केला, त्यांची अवमानना तर दूरच पण स्वप्नातही कुणी निंदा केली तर ती सहन करणार नाही. या देशातील प्रत्येक सनातनी आज जिवंत आहे, हिंदुत्वासाठी सजग आहे, तर त्याचं सर्वात मोठं श्रेय हे शिवाजी महाराजांना जातं. जे छत्रपती शिवाजी महाराजांना मानतात, ते सर्व आपलेच लोक आहेत. त्यामुळे आपापल्यात वाद घातला तर त्याचा फायदा दुसऱ्यांना होईल.
धीरेंद्र शास्त्री पुढे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना मनात दुसरा काहीही विचार नव्हता. गुरुंप्रती शिवाजी महाराजांचा भाव काय होता, संतांच्या प्रती त्यांचा भाव काय होता ते मी माझ्या भाषेत सांगितलं. पण काही लोकांनी त्याचा चुकीचा अर्थ लावला. पण त्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो.
माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. कारण मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो, त्यांच्या स्वराज्याच्या स्वप्नासाठी जगतो. आम्ही हिंदुत्वाची जी विचारधारा स्वीकारली आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांकडूनच. त्यामुळे त्यांचा अवमान होईल असं काही वक्तव्य करणे याचा स्वप्नातही विचार करू शकणार नाही, असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले.
चार मुलांच्या वक्तव्यावरुनही स्पष्टीकरण
प्रत्येकाना चार मुलांना जन्म द्या आणि त्यातील एक मुलगा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला द्या असं वक्तव्य धीरेंद्र शास्त्री यांनी केलं होतं. त्या वक्तव्यावरुनही वाद निर्माण झाल्यानतंर धीरेंद्र शास्त्री यांनी स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की, "मी एका मुलाला संघाला द्या असं म्हटलं होतं. त्याचा अर्थ एक मुलगा हा कट्टर राष्ट्रवादी बनवा. त्याला कलेक्टर बनवा, शिक्षक बनवा किंवा आणखी काही बनवा. परंतु त्याला कट्टर सनातनी विचारांचा बनवा."
ही बातमी वाचा:





















