नागपूर : न्यायिक क्षेत्रात तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर महत्वाचा असला तरी न्यायदानाच्या प्रक्रियेत त्याचा वापर करण्याची आमची कोणतीही योजना नसल्याचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी स्पष्ट केले आहे. ते आज(14 डिसेंबर)नागपुरात मुंबई उच्च न्यायालयाच्या बार एसोसिएशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभात बोलत होते.


सरन्यायाधीश म्हणाले, की अयोध्या सारख्या मोठ्या प्रकरणात हजारो पानांचे दस्तावेज आणि पुरावे न्यायालयासमोर येतात. त्यावेळी तंत्रज्ञान आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने कमी वेळेत त्यांचे अवलोकन करणे सोपे जाते. आज एका सेकंदात 10 लाख शब्दांचं वाचन करणारे सॉफ्टवेयर्स आले असून ते न्यायिक क्षेत्रात महत्वाचे आहेत. मात्र, तंत्रज्ञान फक्त मदत करू शकते. निर्णय प्रक्रियेत त्याचा समावेश करण्याचे नियोजन नसल्याचे सरन्यायाधीश यांनी स्पष्ट केले.

कृत्रिमऐवजी मानवी बुद्धिमत्तेचा वापर करा - माजी सरन्यायाधीश
विशेष म्हणजे सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा सत्कार केल्यानंतर माजी सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांनी न्यायिक क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या वापराबद्दल सावध केले होते. भारत हा वैविध्यपूर्ण देश असून भारतात कोणत्याही एका सॉफ्टवेयरच्या मदतीने सर्वांना मान्य होईल असा न्याय देणे कठीण होईल, असे आर. एम. लोढा म्हणाले होते. त्यानंतर सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी सध्या तरी न्यायदान प्रक्रियेत तंत्रज्ञान किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सला स्थान नाही, असे स्पष्ट केले. वकिलांकडून फी साठी घेतल्या जाणाऱ्या मोठ्या रकमेबद्दल नेहमीच प्रश्न विचारले जातात. मात्र, त्यामध्ये कोर्ट काहीच करू शकत नाही. मात्र, न्यायालयात खटला लढवण्या आधीच मध्यस्ता आणि सामोपचाराने प्रकरण सोडविण्यासाठी काही यंत्रणा निर्माण करण्यात आली. तर न्याय मिळवताना येणारा भरमसाठ खर्च कमी करता येईल, असे मत ही सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी व्यक्त केले.

सरन्यायाधीश बोबडे यांचा नागपुरात गौरव -
देशाचे नवे सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा आज नागपुरात सत्कार करण्यात आला. मुंबई उच्च न्यायालयाच्या बार असोसिएशनतर्फे बोबडेंचा गौरव करण्यात आला. सरन्यायाधीश बोबडे यांचा जन्म नागपुरात झाला आहे. कायदेविषयीचा अभ्यास आणि शिक्षण देखील त्यांचं नागपुरातच झाल आणि आता देशाच्या सरन्यायाधीश पदी पोहोचल्यानंतर त्याचा सत्कार देखील इथंच करण्यात आला.

वाचा - जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीचा सुप्रीम कोर्टाने रिपोर्ट मागवला, गरज पडल्यास सरन्यायाधीश स्वत: काश्मीरला जाणार

मराठमोळे शरद बोबडे सरन्यायाधीशपदी विराजमान, राष्ट्रपतींंनी दिली शपथ

Hyderabad encounter I बदल्याच्या भावनेतून झालेली गोष्ट न्याय नसते - सरन्यायाधीश I एबीपी माझा