नागपूर : समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याच्या निर्णयाला नागपुरातील काही अनुसूचित जातीच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी घेऊन होऊ घातलेल्या समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव कसे देऊ शकता? बाळासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी काय केले असे प्रश्न उपस्थित करत त्यांनी बाळासाहेबांच्या नावाला विरोध केला आहे. त्याऐवजी शेतकऱ्यांसाठी काम करणारे ज्योतिबा फुले किंवा पीडित शोषितांसाठी काम करणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव समृद्धी महामार्गाला द्या, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे.


अर्धवट मंत्रीमंडळात निर्णय घेऊन अशा पद्धतीने आपल्या वडिलांचे नाव देणे योग्य नाही. मराठवाडा विद्यापीठाचे नामांतराच्या वेळी सभागृहांत ठराव होऊन निर्णय झाला होता. आता 6 जणांच्या अर्धवट मंत्रिमंडळात निर्णय घेणे हे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. पुत्राने सत्तेत येऊन वडिलांचं नाव देणे ही योग्य परंपरा ठरणार नाही, असे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. सरकारने न ऐकल्यास लोकांमध्ये जागृती घडवत आंदोलन करू अशी या कार्यकर्त्यांची भूमिका आहे.

समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई-नागपूर द्रुतगती समृद्धी महामार्गाला दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बुधवारी (11 डिसेंबर)घेण्यात आला. हा मार्ग 'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग' म्हणून ओळखला जाईल, अशी माहिती राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

बाळासाहेबांच्या नावामुळे वाद होण्याची शक्यता
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे. कारण, या महामार्गास दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याचा भाजपाचा प्रस्ताव होता. या मार्गाला अटलजींचे नाव देण्याची घोषणा आपण यापूर्वीच केली असल्याचे सांगत अशाप्रकारे दबावाचे राजकारण खेळू नका अशा शब्दांत फडणवीस यांनी शिवसेना नेत्यांना सुनावले. तेव्हा फडणवीस आणि सेना नेत्यांमध्ये झालेल्या शाब्दीक वादानंतर या महामार्गास ठाकरेंचे नाव न दिल्यास राजीनामा देण्याचा इशाराही शिवसेनेच्या मंडळींनी दिला होता. आता सत्तांतर होताच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग असे या महार्गाचे नामांतर करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तर, आता अनुसूचित जातीच्या काही कार्यकर्त्यांनीही याला विरोध दर्शवल्यामुळे ठाकरे सरकार काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

समृद्धी महामार्गासाठी 56 हजार कोटींचा खर्च
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग प्रकल्प हा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वाकांशी प्रकल्पांपैकी एक होता. यासाठी सुमारे 56 हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. मुंबई-नागपूर या शहरांमधील 710 किलोमीटरचा प्रवास यामुळे सहा तासांत होणार आहे. तब्बल 120 मीटर रुंदीचा हा महामार्ग कोकण, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर या पाच महसूल विभागांतील ठाणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा आणि नागपूर या 10 जिल्ह्यातील 27 तालुक्यांच्या 350 गावांमधून जाणार आहे. या प्रकल्पासाठीचे भूसंपादना पूर्ण झाले असून काम प्रगतीपथावर आहे.

हेही वाचा - समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव, मंत्रीमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव, एकनाथ शिंदेंची माहिती

समृद्धी महामार्गाला बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं जाईल, मंत्रीमंडळ बैठकीत प्रस्ताव; एकनाथ शिंदेंची माहिती | ABP Majha