कोकणातील नेत्यांच्या बैठकीत मोठा ट्विस्ट, भरलेले फॉर्म 4 तारखेपर्यंत मागे घेऊ नका, एकनाथ शिंदेंनी सूचना दिल्याची सुत्रांची माहिती
कोकणच्या जागेवरून एकनाथ शिंदे यांनी कोकणच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत.
मुंबई : कोकणच्या जागेवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कोकणच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत. कोकणातील नेत्यांच्या बैठकीत मोठा ट्विस्ट आला आहे. भरलेले फॉर्म 4 तारखेपर्यंत मागे घेऊ नका, अशा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत चर्चा सुरूच राहण्याची शक्यता आहे.
अंतिम चर्चा झाल्यानंतरच उमेदवारीबाबत निर्णय घेऊ
अंतिम चर्चा झाल्यानंतरच उमेदवारीबाबत निर्णय घेऊ, असं मत एकनाथ शिंदे यांनी बैठकीत व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. युतीधर्म पाळण्याच्या सूचना देतानाच शिंदेंनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याबाबत वक्तव्य केल्यानं संभ्रम वाढल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपूर्वीच याच जागेसाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि त्यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांनी शिंदेंची भेट घेतली होती.
एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या या बैठकीला शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार निलेश राणे, विकास गोगावले आणि मंत्री भरत गोगावले हे उपस्थित होते. कोकणची जागा आता राष्ट्रवादीला गेली असल्यामुळे शिवसेनेच्या आमदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी युती धर्म पाळावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. कोकणची जागा जरी राष्ट्रवादीला गेली असली तरी त्या बदल्यात शिवसेनेला रायगडचे पालकमंत्रिपद मिळणार की नाही याबाबत मात्र कोणतीही स्पष्टता नाही.
महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला
महायुतीत विधान परिषदेच्या जागावाटपाचं त्रांगडं अखेर सुटलं आहे. अर्ज भरण्यासाठी सोमवारी शेवटचा दिवस असताना महायुतीने त्यांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. एकूण 17 जागांमध्ये भाजप 11 जागा लढवणार आहे. त्यापाठोपाठ शिवसेना 4 जागांवर लढणार आहे. तर राष्ट्रवादीच्या वाट्याला दोन जागा आल्या आहेत.
विधान परिषदेच्या 17 जागांपैकी किमान सात जागा या आपल्याला मिळाव्यात यासाठी शिवसेनेचे प्रयत्न सुरू होते. शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांनी त्यासाठी चांगलाच जोरही लावला होता. जागावाटपाच्या या चर्चा दिल्लीपर्यंतही गेल्या. मात्र, शिवसेनेच्या वाट्याला अवघ्या 4४ जागा आल्या आहेत.. यामध्ये ठाणे, नाशिक, परभणी आणि यवतमाळच्या जागेचा समावेश आहे. यासोबत सुरुवातीला राष्ट्रवादीला केवळ एक जागा मिळणार, अशी चर्चा होती. मात्र, आता अंतिम जागावाटपानुसार राष्ट्रवादीच्या वाट्याला पुणे आणि कोकण या दोन जागा आल्या आहेत. केंद्रातील नेत्यांच्या चर्चेनंतरच या महायुतीच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब झालं आहे.





















