मुंबई : राज्यात शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर हिरवा कंदील दाखवला आहे. कोरोनामुळे शिक्षण थांबून विद्यार्थ्यांचे नुकसान होतंय. मात्र, विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आपण खेळू शकत नाही. हे लक्षात घेऊन विषाणूचा प्रादुर्भाव नसलेल्या ग्रामीण तसेच शहरांपासून दूरवरील शाळा प्रत्यक्ष सुरू कराव्यात. तर प्रभावित क्षेत्रात ऑनलाईन, डिजिटल पद्धत पायलट प्रॉजेक्ट म्हणून तातडीने राबवावी, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास मान्यता दिली.


आज दुपारी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी शाळा एकवेळ सुरु नाही झाल्या तरी शिक्षण सुरु झाले पाहिजे या विधानाचा पुनरुच्चार केला. मुख्य सचिव अजोय मेहता, शालेय शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, उच्च शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय हे देखील उपस्थित होते. त्यानुसार राज्यात उद्या म्हणजून सोमवारपासून (15 जून) शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे.


विद्यार्थ्यांचे आरोग्य महत्वाचे
शाळा सुरू करण्यासाठी आता सुरुवातीला शाळा व्यवस्थापन समित्यांची सभा आयोजित केली जाणार आहे. गावांमधील कोविड प्रतिबंध समिती तसेच स्थानिक पदाधिकारी यांच्याशी चर्चा केली जाईल. शाळांमध्ये स्वच्छता, निर्जंतुकीकरण, पाण्याची सोय आदि कामे केली जातील. पालक सभा घेऊन त्यांच्या मनातील संभ्रम दूर केले जातील. त्यांना विश्वासात घेतले जाणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक भरणे, ग्राम पंचायतीच्या मदतीने टीव्ही, रेडीओ यांची व्यवस्था करणे जेणेकरून कुठलीच सोय नसलेल्या मुलांना शिक्षणासाठी याची मदत होणार आहे.


शिक्षण विभागाकडून ऑनलाईन शिक्षणासाठी गाईडलाइन्स तयार; विद्यार्थ्यांचे वय, मानसिकता विचारात घेणार


सुरू करण्याचे नियोजन
रेड झोन मध्ये नसलेल्या 9, 10, 12 वी शाळा-कॉलेज जुलैपासून, 6 वी ते 8 वी ऑगस्ट पासून, वर्ग 3 ते 5 सप्टेंबरपासून, वर्ग 1 ते 2 री शाळा व्यवस्थापन समितीच्या मान्यतेने, इयत्ता 11 वीचे वर्ग पुढील महिन्यात लागणाऱ्या दहावीच्या निकालानंतर सुरु करण्याचे नियोजन आहे. ज्या ठिकाणी शाळा सुरु होणार नाही तिथे टाटा स्काय, जिओ यांच्या मदतीने शिक्षणाचे पायलट प्रोजेक्ट लगेचच सुरु करून त्याचा बारकाईने आढावा घेण्याचे मुख्यमंत्री म्हणाले. काही कंपन्यांनी इतर राज्यांत प्रयोग केले आहेत त्याचीही परिणामकारकता तपासावी असे मुख्यमंत्री म्हणाले.


केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्र्यांशी बोलणार
यावेळी बोलताना मंत्री वर्ष गायकवाड यांनी प्राधान्याने दूरदर्शन आणि आकाशवाणीचा उपयोग करून घेण्याची विनंती केली. माहिती व नभोवाणी मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी आपण यासंदर्भात लगेच बोलून ही माध्यमे देखील उपलब्ध करून घेतली जातील असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.


पहिली, दुसरीसाठी ऑनलाईन नाही
ऑनलाईनबाबत पालकांच्या मतांचा विचार करण्यात आलेला आहे. पहिली व दुसरीची मुले लहान असतात, त्यांच्यासाठी ऑनलाईन पर्याय दिला जाणार नाही. 3 ते 5 वीच्या मुलांना दररोज 1 तास व पुढील वर्गाच्या मुलांना दोन तासांपर्यंत ऑनलाईन, डिजिटल शिक्षण देण्याचे नियोजन आहे, अशी माहिती वर्ष गायकवाड यांनी दिली.


Unlock 1.0 | शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरु करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता