मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आदरु करुन महाराष्ट्र सरकार पूर्ण सहकार्य करेल अशी खात्री असल्याचं पवारांनी म्हटलं आहे. तसंच मला आशा आहे की, या तपासाची परिणीती डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येच्या तपासाप्रमाणे होणार नाही, असंही पवार म्हणाले. शरद पवार यांनी या संदर्भात ट्वीट केलं आहे.


सुप्रीम कोर्टाने काल (19 ऑगस्ट) अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयने करण्याचा निकाल दिला. मुंबई पोलिसांनी सीबीआयला संपूर्ण सहकार्य करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. तसंच गोळा केलेले सर्व पुरावे सीबीआयला सोपवण्याचे निर्देशही मुंबई पोलिसांना दिले आहेत. महाराष्ट्राला सरकारलाही निकालाचं पालन करावं लागेल, असंही कोर्टाने स्पष्ट सांगितलं.


यानंतर शरद पवारांनी आज ट्वीट करुन या संपूर्ण विषयावर भाष्य केलं. त्यांनी म्हटलं आहे की, "सर्वोच्च न्यायालयाने सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील तपास सीबीआयच्या स्वाधीन करण्याचा आदेश दिला आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार या निर्णयाचा आदर करुन चौकशी प्रक्रियेत पूर्ण सहकार्य करेल. मला आशा आहे की, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी सीबीआयमार्फत 2014 मध्ये सुरु झालेल्या आणि अद्याप निराकरण होऊ न शकलेल्या चौकशी प्रक्रियेप्रमाणे या तपासकार्याची परिणीती होणार नाही."







सुशांत मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडे
सुप्रीम कोर्टाने काल अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयने करण्याचा निकाल दिला. मुंबई पोलिसांनी सीबीआयला संपूर्ण सहकार्य करण्याचा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात तपास नाही केवळ चौकशी केली होती, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं.


या प्रकरणी 11 ऑगस्टला युक्तिवाद आणि सुनावणी पूर्ण झाली. त्यानंतर 13 ऑगस्टपर्यंत सर्व पक्षकारांनी आपापली बाजू लेखी स्वरुपात संक्षिप्तरित्या मांडली होती. मग सुप्रीम कोर्टाने आपला निकाल सुरक्षित ठेवला होता. त्यानंतर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने हा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निकाल दिला.


दरम्यान, सुशांत सिंह राजपूत 14 जून रोजी मुंबईच्या वांद्र्यातील राहत्या घरी आत्महत्या केली होती.


पार्थ पवार यांचं ट्वीट


अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पार्थ पवार यांनी काल अवघ्या दोन शब्दात प्रतिक्रिया दिली होती. पार्थ पवार यांनी 'सत्यमेव जयते' एवढंच पण सूचक ट्वीट केलं आहे.


दरम्यान, पार्थ पवार यांनी काही दिवसांपूर्वीच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना सुशांत सिंह राजपूत प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यावर शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्या बोलण्याला कवडचीही किंमत देत नाही, अशा शब्दात फटकारलं होतं. त्यानंतर आता पार्थ पवार यांनी 'सत्यमेव जयते' असं ट्वीट केलं.





संबंधित बातम्या




Sharad Pawar | दाभोलकर हत्येच्या तपासाप्रमाणे सुशांत प्रकरणाचा तपास होऊ नये अशी आशा : शरद पवार


CBI Probe in SSR Case | सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा तपास सीबीआय करणार