जयनील वय वर्ष 5, 2019 मध्ये वर्षभर कॅन्सरसारख्या दुर्धर आजराचा लढा देऊन बरा होत नाही, तोच त्याला आणखी एका मोठ्या आजारानं गाठलं. त्या आजारात त्याची हृदयाच्या ठोक्यांची गती इतकी मंदावली की, त्या आजरातून त्याला बाहेर येण्यासाठी हृदयप्रत्यारोपण (Heart Transplantation) हा एकमेव पर्याय असल्याचं त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सुचविलं आहे. जयनीलचे वडील मंगलेश हे नंदूरबार येथे पोलीस दलात चालक म्हणून कार्यरत आहेत. गेले 2 वर्ष ते आपल्या मुलाला वाचविण्यासाठी सर्व शर्तीचे प्रयत्न करत आहेत. गेले तीन महिने ते आपल्या मुलांसोबत मुलुंड येथील फोर्टिस रुग्णालयात राहत आहेत. जयनीलच्या हृदयाच्या ठोक्यांची गती कृत्रिम पद्धतीने नियमित व्हावी म्हणून त्याला एकमो या मशीनवर ठेवण्यात आले आहे. या मशीनमुळं त्याच्या हृदयाचं पंपिंग होत आहे. त्याच्या हृदयाच्या ठोक्यांची गती केवळ 5-10 टक्के आहे, जी गती सर्वसाधारण 60-65 टक्के इतकी असते. खरं तर या हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेला 30-40 लाख खर्च येत असतो, मात्र जयनीलचे पालक तो खर्च कसाही करून भरू असे सांगत, सध्याच्या घडीला आम्हाला सध्या मेंदूमृत अवयव दात्यांकडून त्यांना हृदय हवंय, त्यासाठी सर्व ठिकाणी जनजागृती झाली पाहिजे, असं आवाहन करत आहेत.


नंदूरबार येथे राहणाऱ्या वसईकर दांपत्याला दोन मुले असून जयनील हा पाच वर्षाचा तर आशिष दोन वर्षांचा आहे. वयाच्या चौथ्या वर्षी जयनीलला पोटाचा कॅन्सरचं निदान झालं. त्यानंतर वर्षभर जयनीलवर त्यासाठी मुलूंडच्याच फोर्टिस रुग्णलयात उपचार देण्यात येत होते. वैद्यकीय सल्ल्यानुसार, त्यांनी किमोथेरपीच्या सायकल पूर्ण केल्या. त्या आजरातून घरी बरा झाल्यावर दोन ते तीन महिन्यांनी त्याला उलटीचा भंयकर त्रास जाणवू लागला. लघवी कमी होऊ लागली तसेच चेहऱ्यावर सूज येऊ लागली. या आणि अजून बऱ्याच समस्या जयनीलच्या आयुष्यात पुन्हा येऊ लागल्या. त्यांनंतर जयनीलला तत्काळ पुन्हा डॉक्टरांकडे नेण्यात आलं. त्यानंतर अनेक चाचण्या केल्यानंतर त्याला डायलेटेड कार्डीओमायोपॅथी या आजराचे निदान झालं. या आजरामध्ये हृदयाच्या ठोक्यांची गती मंदावते आणि ती मोठ्या प्रमाणात कमी झाली असेल तर हृदय प्रत्यारोपणाशिवाय त्याला दुसरा पर्याय नाही, थोडक्यात त्या हृदयाचे पम्पिंग होण्याची प्रक्रिया खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेली असते. नेमकं हेच जयनीलच्या बाबतीत झालं आहे.



17 नोव्हेंबरला जयनीलला फोर्टिस रुग्णालयात भरती करण्यात आले, सुरुवारतीच्या काळात त्याची तब्ब्येत नाजूक असल्यामुळे त्याला महिनाभर अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला आता साधारण कक्षात एका विशेष खोलीमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्याची आई जयश्री (28) लहान मुलाला सांभाळून सध्या नंदुबारहुन ये-जा करत आहे. मात्र त्याचे वडील मंगलेश (38) हे साधारण तीन महिन्यापासून रुग्णालयात तळ ठोकून आहेत. त्यांनी अंबरनाथला भाड्यानं रूमही घेतली आहे. अनेक नातेवाईक घरचे लोक येथे मुक्कामासाठी येत असतात.



याप्रकरणी फोर्टिस रुग्णालयातील इंटेन्सव्हिस्ट आणि अॅनेस्थेसिस्ट, जे हृदय प्रत्यारोपण करण्याच्या टीममध्ये आहेत, ते डॉ. शिवाजी माळी यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना सांगितले की, "जयनीलच्या हृदयाच्या ठोक्यांची गती मोठ्या प्रमाणात मंदावली आहे, त्यामुळे त्याला एकमो नावाच्या मशीनवर ठेवण्यात आले आहे. त्याच्या हृदयाची धडधड कृत्रिमरीत्या या मशीनद्वारे सध्या सांभाळली जात आहे. मात्र जास्त काळ या मशीनवर ठेवणे योग्य नाही, या काळात त्याची प्रकृती खालावू शकते. त्यासाठी त्याला लवकरात लवकर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे. त्यासाठी त्याला लवकरात लवकर मेंदूमृत दात्याकडून हृदय मिळाले पाहिजे. त्याचा रक्तगट ओ पॉजिटीव्ह आहे. तसेच त्याचे वजन 20 किलोग्रॅम इतके आहे. त्यामुळे मिळणाऱ्या दात्याचे हृदय हे ओ पॉजिटीव्ह रक्तगटाचे आवश्यक असून त्याचे वजन जास्तीत जास्त 40-50 किलो असणे अपेक्षित आहे. कारण लहान मुलांचे अवयवदान फार मोठ्या प्रमाणात होत नाही त्यामुळे इतका फरक असणारा दाता मिळणं गरजेचं आहे. ही शस्त्रक्रिया आमच्या येथील वरिष्ठ डॉक्टर धनंजय मालनकर हे करणार असून त्यांना या क्षेत्रातील अनुभव आहे."


ते पुढे असेही म्हणतात की, "गेला वर्षभर कोविडचा काळ असल्यानं आपल्याकडे मोठ्या प्रमाणात अवयवदान होऊ शकलेलं नाही. त्यामुळे आपल्याकडे मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज आहे. अनेक रुग्ण प्रतिक्षा यादीवर असून त्यांना अवयव मिळण्यासाठी प्रतिक्षा करावी लागत आहे. जयनीलचे नावही प्रतिक्षा यादीत नमूद करण्यात आले आहे. त्याची सध्या परिस्थिती ठीक असली तरी लवकरात लवकर हृदय मिळाल्यास त्याची प्रकृती चांगली होऊ शकते."


आपल्या देशात आणि राज्यात मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा, 1994 अंतर्गत अवयव प्रत्यारोपण केलं जातं. कालांतराने या कायद्यात अधिक बदल करून 2014 साली काही सुधारणा करण्यात आल्या. आपल्याकडे राज्यात अवयवांच्या नियमनाकरिता चार मुंबई, पुणे, औरंगाबाद आणि नागपूर अशा विभागीय प्रत्यारोपण समन्वय समिती कार्यरत आहेत. या समिती मार्फत ज्या रुग्णांना अवयव पाहिजे आहे, त्यांचे नोंदणीकरण केलं जातं. ही समिती मेंदूमृत व्यक्तीचे अवयव आणि गरजू रुग्णांमध्ये समन्वयाचे काम पाहत असते. गेल्या काही वर्षांत या समित्या उत्तमरीत्या आपलं काम करीत आहेत. या व्यतिरिक्त आपल्या राज्यात काही वर्षांपूर्वीच अवयव दानासंदर्भात राज्यस्तरावर समन्वय साधणारी राज्य अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संस्थेची केंद्र विभागातर्फे स्थापना करण्यात आली आहे.



राज्य अवयव आणि ऊती प्रत्यारोपण संस्थेच्या माहितीनुसार, सध्या राज्यात अवयवांची गरज असणारी रुग्णांची मोठी प्रतीक्षायादी आहे मूत्रपिंडासाठी 5487, यकृतासाठी 1095, हृदयासाठी 89 आणि फुफ्फुसांसाठी 19 रुग्ण प्रतिक्षेत आहेत. यापैकी किडनीसाठी प्रतिक्षेत असणारे रुग्ण डायलेसीसवर आणखी काही महिने जगू शकतात. मात्र हृदय, यकृत आणि फुफ्फुस यांसारखे अवयव असणाऱ्या रुग्णांची परिस्थिती ही बिकट असते. कारण त्यांना अवयव प्रत्यारोपण करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो.


जयनीलचे वडील मंगलेश वसईकर आपल्या या वेदनादायी प्रवासाबद्दल माहिती देताना सांगतात की, "गेली दोन वर्ष मी माझा मुलगा बरा व्हावा त्यासाठी संघर्ष करत आहे आणि त्याला चांगले करण्यासाठी अजूनही प्रयत्न करत राहिल. मी आणि माझे कुटुंब किती वाईट परिस्थितून जात आहे ते महत्वाचे नाही. मला माझ्या मुलाच्या चेहऱ्यावर हसू बघायचं आहे. माझ्या मुलाच्या उपचारासाठी सध्या पोलीस योजनेमधून मला आर्थिक मदत होत आहे. त्यासाठी पोलीस दलाचा मी आभारी आहे. फक्त आता माझ्या मुलाच्या हृदयाची धडधड नैसर्गिक पद्धतीनं व्हावी याकरिता मेंदूमृत अवयवदात्याची गरज आहे. यासाठी अवयवदान या विषयावर जजागृती झाली पाहिजे. जयनील सारखा रुग्ण हृदयासाठी वाट पाहत आहे. मला पैसे नकोत ते मी विविध पद्धतीने प्रयत्न करून पैसे उभारेन पण माझ्या मुलाला सध्या जगण्यासाठी हृदय या अवयवाची खूप गरज आहे. माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे. अवयदान या विषयावर सगळ्यांनी बोलते व्हा."


महत्त्वाच्या इतर बातम्या :