मुंबई : मानखुर्दच्या मंडल परिसरात भीषण आग लागली आहे. याठिकाणी लाकूड आणि इतर ज्वालाग्राही पदार्थांच्या वखारी आहेत. अग्निशमन दलाच्या 19 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. ज्या परिसरात आग लागली आहे. त्याठिकाणी रहिवाशी लोकांची वस्तीदेखील आहे. नेमकी आग कशामुळे लागली त्याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.


आगीमुळे आजूबाजूच्या परिसरात धुराचे लोळ पसरल्याचं पाहायला मिळत आहेत. मानखुर्द परिसरातील या ठिकाणाला कुर्ला स्क्रापयार्ड असंही म्हटलं जातं. येथे लाकूड आणि इतर ज्वालाग्राही पदार्थांच्या वखारी आहेत. तसेच एखाद्या ब्लास्टमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या ठिकाणी लाकडाचे सामान मोठ्या प्रमाणावर ठेवलं जातं. दुपारी अडीचच्या दरम्यान आग लागली.


स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी अडीच वाजता आग लागली. याठिकाणाहून धुराचे लोळ बाहेर येत असल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी अग्निशमन दलाला आग लागल्याची माहिती दिली. अग्निशमन दलानं तत्काळ घटनास्थळी धाव गेत आग विझवण्याचं काम सुरु केलं आहे. परंतु, कालांतराने आगीनं रौद्र रुप धारण केलं.


याप्रकरणी बोलताना स्थानिक आमदार अबू आझमी यांनी सांगितलं की, "याठिकाणी अनधिकृत व्यवसायामुळे दरवर्षी येथे आग लागते. यासंदर्भात आम्ही अनेकदा विधानभवनातही सांगितलं आहे. तसेच पत्रदेखील दिलं आहे. अनधिकृत व्यवसायांमुळे इथे दरवर्षी आग लागते. तसेच मोठ्या प्रमाणावर आग लागते. त्यामुळे यावर लवकरात लवकर कारवाई करणं गरजेचं आहे. अद्याप यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नसून याची दखलही घेतलेली नाही. त्यामुळे सरकार यासंदर्भात बेजबाबदार भूमिका घेत आहे असं मला वाटत आहे."