Mumbai Water Supply : मुंबईत 10 टक्के पाणी कपात सुरू; दररोज 520 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा कमी होणार
Mumbai Water Cut : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील साठा 22 टक्क्यांवर आल्याने 10 टक्के पाणी कपात लागू होणार आहे. मात्र पाणीपुरवठ्याच्या वेळेत कोणताही बदल होणार नसल्याचं प्रशासनानं स्पष्ट केलं.

Mumbai Water Cut : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शुक्रवारपासून मुंबईत 10 टक्के पाणी कपात लागू करण्यात येणार आहे. सध्या मुंबईला दररोज सुमारे 5200 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र या निर्णयामुळे दररोज तब्बल 520 दशलक्ष लिटर पाणी कमी पुरवलं जाणार आहे. धरणांमधील पाणीसाठा केवळ 22 टक्क्यांवर आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
आगामी काही आठवड्यांत पाण्याची परिस्थिती नियंत्रणात राहावी आणि उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करता यावे यासाठी ही कपात करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मान्सूनपूर्व कालावधीत पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहनही नागरिकांना करण्यात आले आहे.
BMC Water Supply : पाणीपुरवठ्याच्या वेळेत बदल नाही
पाणी कपात लागू होत असली तरी मुंबईतील पाणीपुरवठ्याच्या वेळांमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. नागरिकांना सध्या ज्या वेळेत पाणी मिळते, त्याच वेळेत पाणीपुरवठा सुरू राहील. तसेच पाण्याचा दाब शक्य तितका कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.
High Rise Areas Water Supply : उंच भागांवर विशेष लक्ष
विशेषतः उंच भागांमध्ये पाणी व्यवस्थित पोहोचत आहे की नाही, यावर अधिकाऱ्यांकडून बारकाईने लक्ष ठेवलं जाणार आहे. पाणी कपातीचा परिणाम कमी करण्यासाठी वितरण व्यवस्थेवर सतत नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.
Dam Storage Crisis : धरणसाठा घटल्याने निर्णय
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांमधील एकूण पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. सध्या उपलब्ध साठा केवळ 22 टक्क्यांवर पोहोचल्याने मुंबई महानगरपालिकेला पाणी कपातीचा निर्णय घ्यावा लागला. मान्सून वेळेत दाखल होईपर्यंत पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे.
MMR Water Situation : एमएमआरमधील इतर शहरांतील स्थिती
ठाणे महानगरपालिकेने सध्या कोणतीही अधिकृत पाणी कपात जाहीर केलेली नाही. कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातही पाणी कपात लागू नसल्याचं सांगण्यात आलं आहे. वसई-विरार महानगरपालिकेतही सध्या पाणीपुरवठा सुरळीत सुरू आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने अद्याप पाणी कपातीबाबत निर्णय घेतलेला नसून पुढील आठवड्यात धरणातील पाण्याची पातळी पाहून निर्णय घेतला जाणार आहे. मीरा-भाईंदरमध्ये यापूर्वी 31 तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता, मात्र सध्या पाणीपुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Mumbai Water Saving Appeal : पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन
मुंबईत 10 टक्के पाणी कपात लागू होत असल्यानं नागरिकांनी अनावश्यक पाण्याचा वापर टाळावा, गळती त्वरित दुरुस्त करावी आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे.
ही बातमी वाचा:
Before You Go
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय






















