मुंबई : कोरोना लॉकडाऊनमुळे मुंबईतील गुन्हेगारीचे प्रमाण 65 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. सरकारी आकडेवारीनुसार मार्च महिन्यात मुंबईत एकूण 1100  एफआयआर नोंदविण्यात आल्या आहेत. गेल्या वर्षी याच महिन्यात 3368 एफआयआर नोंदविण्यात आल्या होत्या. या 1100 प्रकरणांमध्ये बहुतांश घटनांमध्ये कलम 188 चे उल्लंघन करण्याची प्रकरणं आहेत म्हणजे लाॅकडाऊनचं उल्लंघन.  2019 मध्ये एकूण 41933 गुन्हे नोंदविण्यात आले होते, त्यातील बहुतांश चोरीचे होते.


गेल्या वर्षी मार्च महिन्यात एकूण 484 चोरीच्या घटना नोंदवल्या गेल्या, परंतु यावर्षी मार्च महिन्यात ही प्रकरणे जवळजवळ शून्य आहेत. तज्ञांच्या मते, याची दोन कारणे आहेत. चोरण्यासाठी गर्दीची जागा लागते, गर्दीच्या ठिकाणी चेन स्नॅचिंग, मोबाईल, पर्स, बॅग सारखी चोरी करणं सोपं असतं.  परंतु लाॅकडाऊनमुळे गर्दी नाही ज्यामुळे चोरी करणं शक्य होऊ शकत नाही. त्याचबरोबर घरफोडीची प्रकरणं अधिक असतात पण लॉकडाऊनमुळे लोक आपल्या घरात आहेत आणि अशा परिस्थितीत चोरांना चोरी करणे शक्य होत नाही.




मार्च महिन्याआधी स्ट्रीट क्राईम म्हणजे चैन स्नॅचिंग, रस्त्यावरील भांडणे, खून, चोरी, अपघात इत्यादी अनेक घटना नोंदवल्या गेल्या आहेत.  पण आता लोक रस्त्यावरच येत नसल्यामुळे अशा  प्रकारच्या गुन्हेगारीत मोठी घट आहे.


लाॅकडाऊनच उल्लंघन होऊ नये म्हणून पोलिस सध्या कठोर कारवाई करत आहेत. त्यामुळे घटलेल्या क्राईम रेटमुळे पोलिसांना देखील कोरोना लॉकडाऊनमध्ये मोठी मदत मिळत आहे, तर छोट्या छोट्या गुन्ह्यांमध्ये पोलिस अटक देखील पुढे ढकलत आहेत. तसेच सध्या लॉकडाऊनमुळे गंभीर प्रकरणांव्यतिरिक्त लोकांच्या जामिनाला विरोध ही करत नसल्याचं चित्र आहे.


एकूणच मुंबईसारख्या महानगरात रोजच्या गर्दीमुळं गुन्हेगारीचं प्रमाण अधिक पाहायला मिळतं. मात्र सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रमाणामुळं बाहेर गर्दी नाही तसेच लोक आपापल्या घरात असल्यानं चोऱ्यांचं प्रमाण देखील नगण्य आहे.