मुंबई : राफेल विमान खरेदी व्यवहारावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वादग्रस्त टीका केल्याच्या आरोप करत राहुल गांधींविरोधात मानहानीचा खटला दाखल झाला आहे. या दाव्यावर फौजदारी कारवाई सुरु करण्याचे आदेश गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने दिले असून त्याबाबत राहुल गांधींना दुसरं समन्स बजावत 15 फेब्रुवारीला कोर्टापुढे हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. याआधी ऑगस्ट 2019 मध्ये या कोर्टानं राहुल गांधींना पहिलं समन्स जारी करत 3 ऑक्टोबरला कोर्टापुढे हजर राहण्याचे निर्देश दिले होते.


राहुल गांधी यांनी राफेलबाबत टीका करताना मोदी यांच्यावर 'कमांडर इन थीफ', 'चौकीदार चोर है', 'चोरो का सरदार'अशी टीका केली होती. यामुळे मोदी यांच्यासह भारतीय जनता पार्टी आणि त्यातील सदस्यांचीही प्रतिम मलिन झाली आहे. त्यामुळे त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकत भाजपचे कार्यकर्ते महेश श्रीश्रीमल यांनी ही याचिका दाखल केली आहे.

राहुल गांधी यांनी जयपूर, राजस्थान, अमेठी येथील दौऱ्यामध्ये केलेल्या विधानांमध्ये या याचिकेत समावेश आहे. तक्रारदार हे भाजपचे सदस्य असल्यामुळे ते अशाप्रकारची तक्रार करण्याचा अधिकार त्यांना आहे, असं मत व्यक्त करत या कोर्टानं हे समन्स जारी केलं आहे. या दाव्यावर पुढील सुनावणी 3 ऑक्‍टोबर रोजी होणार आहे. गांधी यांच्याविरोधात याशिवाय भिवंडी आणि शिवडी न्यायालयातही मानहानीच्या तक्रारी प्रलंबित आहेत.

20 सप्टेंबर 2018 रोजी जयपूरच्या एका सभेत राहुल गांधींनी, 'गली गली मे शोर है, हिंदुस्तान का चौकीदार चोर है' असा नारा दिला होता. तसेच 24 सप्टेंबरला एक ट्वीट करून राहुल गांधींनी मोदींना उद्देशून अपमानकारक, मानहानीकारक विधानं केली होती. ज्यामुळे तमाम भारतीयांची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलीन झाल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे. देशाच्या अत्यंत महत्त्वाच्या पदावर असलेल्या व्यक्तीच्याबाबतीत अशी विधान करून राहुल गांधींनी भाजपच्या तमाम कार्यकर्त्यांचाही अपमान केला आहे. असा दावा या याचिकेतून करत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

वर्षभरात एक कोटी लोकांनी रोजगार गमावल्यामुळे मोदी आता नोकऱ्यांबाबत बोलत नाहीत; राहुल गांधींचा टोला