काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मित्राकरवी चोरी केली आहे. राहुल गांधी म्हणाले की, वित्रमंत्री अरुण जेटली राफेलबाबत सुरुवातीला म्हणाले होते की, त्यांना राफेलची कोणतीही माहिती नाही. काही दिवसांनंतर जेटली म्हणाले की, राफेल डील एक सिक्रेट आहे, याबाबत कोणतीही माहिती देता येणार नाही.
राहुल यांनी मोदींवर भारतीय तरुणांचे रोजगार हिरावण्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, "राफेल जर भारतात तयार केले असते, तर भारतात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती झाली असती. परंतु त्यांनी फ्रान्सच्या राष्ट्रपतींना राफेल फ्रान्समध्ये तयार करण्यास सांगितले. हे सर्व केवळ राफेलची खरी किमंत भारतीयांना कळू नये यासाठी केले आहे".
गेल्या काही महिन्यांमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राफेलवरुन मोदींवर सातत्याने टीका केली आहे. परंतु आज सुप्रीम कोर्टाने याबाबत कोणताही हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर "राफेल घोटाळा झालाच कसा? हे राहुल गांधींनी सांगावे असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाहांनी राहुल गांधींना दिले. अमित शाहांच्या आव्हानाला राहुल गांधींनी थेट पत्रकार परिषदेत उत्तर दिलं.