नवी दिल्ली : राफेलप्रकरणी सुप्रीम कोर्टाने आज पंतप्रधान मोदींना दिलासा देत या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी राफेल प्रकरणावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या राहुल गांधींवर टीका केली. त्याला राहुल गांधींनी थेट पत्रकार परिषदेत उत्तर दिले. राहुल गांधी यांनी राफेल प्रकरणावरुन पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केले. तसेच "चौकीदारही चोर है", असे म्हणत पंतप्रधानांवर टीका केली.


काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मित्राकरवी चोरी केली आहे. राहुल गांधी म्हणाले की, वित्रमंत्री अरुण जेटली राफेलबाबत सुरुवातीला म्हणाले होते की, त्यांना राफेलची कोणतीही माहिती नाही. काही दिवसांनंतर जेटली म्हणाले की, राफेल डील एक सिक्रेट आहे, याबाबत कोणतीही माहिती देता येणार नाही.

राहुल यांनी मोदींवर भारतीय तरुणांचे रोजगार हिरावण्याचा आरोप केला आहे. ते म्हणाले की, "राफेल जर भारतात तयार केले असते, तर भारतात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती झाली असती. परंतु त्यांनी फ्रान्सच्या राष्ट्रपतींना राफेल फ्रान्समध्ये तयार करण्यास सांगितले. हे सर्व केवळ राफेलची खरी किमंत भारतीयांना कळू नये यासाठी केले आहे".

गेल्या काही महिन्यांमध्ये काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी राफेलवरुन मोदींवर सातत्याने टीका केली आहे. परंतु आज सुप्रीम कोर्टाने याबाबत कोणताही हस्तक्षेप करण्याची गरज नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर "राफेल घोटाळा झालाच कसा? हे राहुल गांधींनी सांगावे असे आव्हान भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष अमित शाहांनी राहुल गांधींना दिले. अमित शाहांच्या आव्हानाला राहुल गांधींनी थेट पत्रकार परिषदेत उत्तर दिलं.