एक्स्प्लोर
मुंबई महापौरपदाबाबत अखेर मनसेने मौन सोडलं !

मुंबई : मुंबई महापौरपदाबाबत मनसेकडे सर्व पर्याय खुले असून, कुणीही मनसेला गृहीत धरु नये, असं मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी ठणकावले आहे. “मनसेकडे सर्व पर्याय खुले आहेत. निवडणुकीआधी जे झालं ते झालं. मात्र, जिथे चुका आहेत तिथे आम्ही बोलूच. मनसेला कुणीही गृहीत धरु नये.”, असे मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई म्हणाले. मुंबईचा महापौर मराठी माणूसच असेल. मराठी माणसाच्या हिताची भूमिका घेऊ, असेही पक्षाची भूमिका मांडताना नितीन सरदेसाई यांनी सांगितले. मुंबई महापालिकेत मनसेने सपाटून मार खाल्ला. मनसेचे अवघे 7 नगरसेवक निवडून आले. मात्र, या सातही नगरसेवकांना महापौरपदाच्या निवडणुकीत महत्त्व प्राप्त झालं आहे. भाजप आणि शिवसेना अशा दोन्ही पक्षांकडून आपापल्या परीने महापौरपदासाठी चाचपणी सुरु असल्याने मनसेचा भाव वधारला आहे. त्यामुळे मनसेच्या भूमिकेची सर्वांनाच उत्सुकता होती. मुंबईचा महापौर मराठीच असेल आणि मराठी माणसाच्या हिताचीच भूमिका मनसे घेईल, असे सांगत नितीन सरदेसाई यांनी मुंबई महापौरपदाबाबत अखेर मनसेची भूमिका मांडली आहे. मात्र, त्यातही अस्पष्टता आहे. कुणाला पाठिंबा देणार की तटस्थ राहणार, हे मनसेने स्पष्ट न केल्याने राजकीय वर्तुळात आडाखे बांधणं सुरुच आहे.
Before You Go
Gokul Gite Nashik: प्रचार थांबवूनही निवडणूक कशी जिंकली?; गोकुळ गीतेंनी सांगितली विजयाची Inside Story























