Maharashtra Politics | सरकारमधील तिसरी विकेट नेमकी कुणाची? चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानंतर चर्चेला सुरुवात
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आणखी सरकारमधील एका मंत्र्यांची विकेट पडणार असं सूतोवाच केलं आहे. त्यामुळे ही तिसरी विकेट कुणाची? या चर्चेला सुरुवात झाली आहे.

मुंबई : गेल्या 36 दिवसात महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारमधील दुसऱ्या मंत्र्याचा राजीनामा घेण्याची वेळ आली आहे. यापूर्वी एका तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी शिवसेनेचे मंत्री संजय राठोड यांना राजीनामा देऊन घरी जावं लागलं. या प्रकरणावरुन उडालेली धूळ शांत होते न होते तेच मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी लेटर बॉम्ब टाकला आणि याच प्रकरणात गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही पदावरुन पायउतार व्हावं लागलं. राज्यात अशा राजकीय हालचाली सुरु असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आणखी एका मंत्र्यांची विकेट पडणार असं सूतोवाच केलं आहे. त्यामुळे ही तिसरी विकेट कुणाची? या चर्चेला सुरुवात झाली आहे. 'येत्या आठ दिवसात आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार' असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. मात्र, या मंत्र्याचं नाव सांगण्यास त्यांनी नकार दिला.
चंद्रकांत पाटील यांनी पहिल्यांदाच अशा प्रकारचं वक्तव्य केलं असं नाही, तर यापूर्वी 16 मार्च रोजी त्यांनी असंच एक विधान केलं होतं. ज्यात चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, "एका मंत्र्यांचा राजीनामा आज होण्याची शक्यता आहे. पण त्या दिवशी काही राजीनामा झाला नाही. मात्र महिनाभरात अनिल देशमुख यांचा राजीनामा आला. संजय राठोड आणि अनिल देशमुख यांच्यानंतर आता महाविकास आघाडीमधील तिसरी विकेट कुणाची पडणार? असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे.
मनसुख हिरण हत्याप्रकरणात सचिन वाझे यांच्यावर विरोधकांनी आरोप केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझे लादेन आहे का? असं म्हणत विरोधकांवर टीकास्त्र सोडलं होतं. सचिन वाझे पूर्वी शिवसेनेचे प्रवक्ते होते. त्यामुळेच मुख्यमंत्री ठाकरे सचिन वाझेची पाठराखण करत आहेत, असा आरोप विरोधकांनी केला होता. त्यामुळे सचिन वाझे प्रकरणात तिसरा मंत्री शिवसेनेचा तर असणार नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे. सचिन वाझेचा राजकीय ऑपरेटर कोण? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही उपस्थित केला होता. त्यानंतर आता चंद्रकांत पाटील तिसरी विकेट पडणार असं वक्तव्य करत आहेत. त्यामुळे हा तिसरा मंत्री शिवसेनेच्या गोटातील आहे का? याची दबक्या आवाजात का होईना पण चर्चा सुरू झाली आहे.
भाजपचे नेते नारायण राणे यांनीही काल (5 एप्रिल) घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये 'सचिन वाझे प्रकरणात ठाकरे सरकारमधील एका मंत्राचा सहभाग आहे', असा जाहीर आरोप केला होता, पण त्यांनीही नाव घेणं टाळलं पण त्यांचा रोख थेट शिवसेनेकडे होता. त्यामुळे शिवसेनेतील एखाद्या मंत्र्याचं नाव या प्रकरणात येतं का? हे पाहावे लागेल.
मुकेश अंबानी यांच्या बंगल्याबाहेर स्फोटकाचं प्रकरण मनसुख हिरण हत्या प्रकरण आणि आता शंभर कोटी टार्गेट प्रकरण या तिन्हीची चौकशी सीबीआयकडे गेलेली आहे. येत्या पंधरा दिवसात सीबीआय या प्रकरणात प्राथमिक अहवाल देणार आहे. त्यामुळे सीबीआयच्या चौकशीतून नेमकं काय समोर येतं? आणि त्यातून आणखी एखादा मंत्री गोत्यात येतो का? हे पाहणं महत्त्वाचे आहे. अर्थात राजकारणात विरोधकांच्या सगळ्यात आरोपांमध्ये तथ्य असतं असं नाही. त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी तिसऱ्या विकेटबद्दल केलेलं वक्तव्य खरंच गंभीर आहे की फक्त पाटलांनी खेळलेला तो राजकीय डाव आहे हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल.
Before You Go
Majha Sanman Award 2026 : नितीन गडकरी, आशा पारेख अन् जॅकी श्रॉफ; माझा सन्मानमध्ये उलगडले रंजक किस्से






















