मुंबई : राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि अभिनेत्री कंगना रनौतमधील आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वक्तव्यावर कंगनाने पलटवार केला आहे. महाराष्ट्र कुणाच्याही बापाचा नाही. महाराष्ट्र त्यांचाच आहे ज्यांना मराठीचा अभिमान आहे. अभिमानाने सांगते मी मराठा आहे, माझं तुम्ही काय करणार? असं उत्तर कंगनाने ट्विटरवरुन दिलं आहे.


सिनेसृष्टीच्या शंभर वर्षात मराठा अभिमानावर एकही चित्रपट बनलेला नाही. मुस्लीमांचं वर्चस्व असलेल्या इंडस्ट्रीमध्ये मी माझे जीवन आणि सिनेकारकीर्द पणाला लावली आहे. शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांच्यावर चित्रपट बनवला. आज महाराष्ट्राच्या या कंत्राटदारांना विचारा, तुम्ही महाराष्ट्रासाठी काय आहे? असं ट्वीट कंगनाने केलं आहे.





महान वडिलांचे पूत्र होणे हे तुमचं एकमेव कर्तृत्व असू शकत नाही. मला महाराष्ट्राच्या प्रेमाचे किंवा द्वेषाचे प्रमाणपत्र देणारे तुम्ही कोण आहात? तुम्ही माझ्यापेक्षा महाराष्ट्रावर जास्त प्रेम करता? आणि आता मला तिथे येण्याचा अधिकार नाही? हे तुम्ही कसे ठरवले, असा सवाल कंगनाने विचारला आहे.


कंगनाला मुंबईत राहण्याचा कोणताही अधिकार नाही : गृहमंत्री


"कंगनाने मुंबई पोलिसांची तुलना माफियांसोबत केली आहे. त्यामुळे तिला महाराष्ट्रात किंवा मुंबईत राहण्याचा अधिकार नाही. मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस हे सक्षम पोलीस दल आहे. त्याची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांसोबत केली जाते. अशा पोलिसांविषयी एखादी अभिनेत्री बोलत असेल तर योग्य नाही. त्यांना जर सुरक्षित वाटत नाही तर त्यांनी मुंबईत किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही."


काय आहे प्रकरण?


कंगना गेल्या काही दिवसांपासून मुंबई पोलिसांवर सातत्याने टिका करते आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचा तपास योग्य होत नसल्यावरून तिने मुंबई पोलिसांवर टीका केली. त्याची आत्महत्या नसून हत्याच आहे असं सांगतानाच मुंबई पोलिसांवर तिने अनेक गंभीर आरोप केले. मुंबई पोलिसांची आपल्याला सातत्याने भीती वाटत असल्याचं तिने सांगितलं. यावरूनच खासदार संजय राऊत यांनी ज्या लोकांना मुंबईची इतकी भीती वाटते त्यांनी मुंबईत येऊ नये असं वक्तव्य केलं.


याच वक्तव्याचा विपरित अर्थ घेत त्याला धमकी ठरवून कंगनाने मुंबईला पाकव्याप्त काश्मीरची उपमा दिली. जी मुंबईसह महाराष्ट्राच्या जिव्हारी लागली. त्यावर अनेक मराठी, हिंदी, कलाकार ट्विटरवर व्यक्त झाले. यात सोनू सूद, रेणुका शहाणे, सई ताम्हणकर, सुबोध भावे, सायली संजीव, शेखर फडके, मंगेश देसाई, समीर विद्वांस आदी अनेक कलाकारांचा समावेश होतो. अनेकांनी मुंबई आपल्याला प्रिय असल्याचं यात म्हटलं आहे. नेटकऱ्यांनी मात्र कंगनाच्या या वक्तव्याचा यथेच्छ समाचार घेतला. तर बीजेपीच्या समर्थकांनी कंगनाला पाठिंबा दिला.


भाजप समर्थक आणि मुंबईप्रेमी आमनेसमाने भिडल्याचं चित्र यात दिसत होतं. असं असतानाच आज कंगनाने आणखी एक ठिणगी पेटवून दिली. मी मुंबईला न येण्याबद्दल धमकावलं जात आहे. आता तर मी मुंबईत येणारच. येत्या आठवड्यात 9 सप्टेंबरला मा मुंबईला येणार आहे. वेळ मी कळवेनच. कुणाच्या बापात हिंमत असेल तर त्यांनी मला रोखून दाखवावं असं आव्हान तिनं दिलं आहे. यालाच उत्तर म्हणून संजय राऊत यांचे हे ट्वीट असल्याचे बोलले जात आहे.





संबंधित बातम्या