मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोतने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केल्यानंतर तिच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. बॉलिवूडपासून राजकारणी आणि सर्वसामान्य तिच्यावर टीकेचे आसूड ओढत आहेत. त्यातच आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. कंगनाला महाराष्ट्र किंवा मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, असं अनिल देशमुख म्हणाले.


सुशांत सिंह राजपूत संशयित आत्महत्येप्रकरणी बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोत गेले अनेक दिवस ट्विटरच्या माध्यमातून राज्य सरकार, महाराष्ट्र पोलीस आणि बॉलिवूडवर टीका करत आहे. माफियांपेक्षा मुंबई पोलिसांची भीती वाटते, मला वक्तव्य केल्यानंतर, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी कंगनाला मुंबईत सुरक्षित वाटत नसेल तर इथून निघून जावं, असं म्हटलं होतं. यानंतर संजय राऊत यांनी आपल्याला मुंबईत न येण्याची धमकी दिली असून मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी वाटू लागली आहे, अशी टीका कंगनाने ट्विटरवरुन केली होती. यानंतर अनेक सेलिब्रिटींनी कंगनाचा समाचार घेतला आहे.


मात्र तरीही कंगनाच्या ट्वीटचा धडाका सुरुच होता. शिवाय मुंबई पोलिसांची तुलना माफियांसोबत केल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही कठोर भूमिका घेतल्याचं दिसत आहे. ते म्हणाले की, "कंगनाने मुंबई पोलिसांची तुलना माफियांसोबत केली आहे. त्यामुळे तिला महाराष्ट्रात किंवा मुंबईत राहण्याचा अधिकार नाही. मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस हे सक्षम पोलीस दल आहे. त्याची तुलना स्कॉटलंड यार्ड पोलिसांसोबत केली जाते. अशा पोलिसांविषयी एखादी अभिनेत्री बोलत असेल तर योग्य नाही. त्यांना जर सुरक्षित वाटत नाही तर त्यांनी मुंबईत किंवा महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही."


संबंधित बातम्या