मुंबई : शेतकरी आंदोलनाला समर्थन देणाऱ्या परदेशातील सेलिब्रिटींविरोधात ट्वीट करणाऱ्या भारतातील सेलिब्रिटीच्या ट्वीटची चौकशी करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. सरकारच्या या निर्णयावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सडकून टीका केली आहे. "भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत. तसंच चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मागणी मान्य करणारे यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी केली पाहिजे," अशा शब्दात त्यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.


दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाबाबत सेलिब्रिटींनी केंद्र सरकारच्या दबावाखाली ट्वीट केलं का? याची तपासणी केली जाणार आहे, अशी माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. काँग्रेस नेत्यांच्या तक्रारीनंतर गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. राज्याचं गुप्तहेर विभाग याची चौकशी करणार आहे.


देवेंद्र फडणवीस यांची टीका


संतापजनक ❗ कुठे गेला मराठीबाणा❓ कुठे गेला महाराष्ट्रधर्म❓ भारतरत्नांची चौकशी करणारे असे ‘रत्न’ देशात कुठेही सापडणार नाहीत. निषेध करावा तितका थोडा! या सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय❓ भारतरत्नांची चौकशी करण्याची भाषा वापरताना शरम वाटली पाहिजे. खरे तर चौकशी करण्याची मागणी करणारे आणि ती मागणी मान्य करणारे यांच्या मानसिक स्थितीचीच चौकशी केली पाहिजे," अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.





पॉप गायिका रिहानासह इतरांना उत्तर देताना अनेक सेलिब्रिटींनी विरुद्ध ट्वीट केलं होतं. यामध्ये सुनील शेट्टीने मुंबई भाजप नेते हितेश जैन यांना टॅग केलं होतं. तर अक्षय कुमार आणि सायना नेहवाल ह्यांच्या ट्वीटमधील शब्द आणि शब्द समान होता. यावरून हे सेलिब्रिटी भाजप सरकारच्या दबावात येऊन ट्वीट करत आहेत का? असा सवाल काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी उपस्थित केला होता.


ग्लोबल सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर सिनेकलाकार, क्रिकेटर यांनी देखील ट्वीट केले होते. पॉप स्टार रिहानाने शेतकऱ्यांना समर्थन दिल्यानंतर ग्रेटा थॅनबर्ग, मिया खलिफा सारख्या अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबा देत ट्वीट केले होतं.


संबंधित बातम्या