Farmer Protest : केंद्र सरकारच्या नवीन कृषी कायद्याच्या निषेधार्थ शेतकरी सुमारे 70 दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आता जागतिक सेलिब्रिटीही शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आवाज उठवत आहेत. पॉप स्टार रिहाना आणि ग्रेटा थनबर्ग यांच्या नंतर आता मिया खलिफा हिनं देखील शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्वीट केलं आहे. मियानं एक फोटो शेअर करत मी शेतकऱ्यांच्या सोबत आहे असं म्हटलं आहे.


काय म्हणाली मिया खलिफा 


मिया खलिफानं शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ट्वीट केलं असून त्यात म्हटलं आहे की, मानवाधिकाराचं इथं उल्लंघन होत आहे. नवी दिल्लीच्या आसपासच्या परिसरात इंटरनेट बंद केलं आहे. दुसऱ्या ट्वीटमध्ये तिनं काही कलाकारांना टार्गेट करत म्हटलं आहे की, पेड अॅक्टर्स... मला खात्री आहे की, पुरस्कारांच्या मोसमात यांच्या नावाला डावललं जाणार नाही. मी शेतकऱ्यांच्या सोबत आहे, असं तिनं म्हटलं आहे.





पॉप स्टार रिहाना काय बोलली?


खरं तर, कॅरिबियन पॉप स्टार रिहानाने काल संध्याकाळी शेतकङऱ्यांच्या आंदोलनाशी संबंधित एक बातमी शेअर केली. ही बातमी शेतकऱ्यांच्या निदर्शनाच्या जागेभोवती इंटरनेट बंद करण्याविषयी होती. रिहानाने ही बातमी शेअर केली आणि लिहिले की, "आपण याबद्दल का बोलत नाही? रिहानाने #FarmersProtest या हॅशटॅगसह हे ट्वीट केले."





ग्रेटा थनबर्ग काय म्हणाली?


रिहानाच्या ट्वीटनंतर पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गनेही शेतकरी आंदोलनाविषयी ट्वीट केले. ग्रेटा यांनी ट्विटरवर लिहिले की, “आम्ही भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलकांसोबत एकतेने उभे आहोत." ग्रेटा थनबर्गला 2019 मध्ये अमेरिकन मॅगझिन टाईम्सने 'पर्सन ऑफ द इयर' म्हणून घोषित केले होते. ग्रेटा चर्चेत आली होती ज्यावेळी अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी ग्रेटाचा शाब्दिक चकमक झाली होती.





पॉपस्टार रिहानाच्या ट्वीटवर भडकली कंगना


कंगनाने ट्वीट केले, "या विषयावर कोणी बोलत नाही कारण आंदोलन करणारे शेतकरी नसून आतंकवादी आहे. जे भारताच्या एकतेला तोडण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यामुळे चीन आपल्या देशावर हल्ला करेल आणि अमेरिकेसारखी चायनीज कॉलनी बनवेल. शांत रहा आम्ही तुमच्यासारखे मुर्ख नाही जो आपला देश विकू"


दिल्लीच्या सिंधू, टिकरी आणि गाजीपूर या तीन सीमांवर शेतकरी आंदोलन सुरू आहे. याठिकाणी पोलिसांनी कडक बंदोबस्त वाढवला आहे. टिकरी सीमेवर रस्त्यावर मोठे खिळे पसरल्यानंतर प्रशासनाने सिंघू सीमेवर सिमेंटच्या सहाय्याने बॅरिकेट्स जोडून भिंत तयार केली आहे. गाझीपूर सीमेवर काटेरी तार बसवण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर ज्या ठिकाणी शेतकरी आंदोलन सुरु आहे तिथे इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे.


संबंधित बातम्या