मुंबई : दाभोळकर-पानसरे प्रकरणी गेली चार वर्ष रखडलेले खटले आता पुन्हा सुरु होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात तपासयंत्रणांनी खटल्याच्या स्थगितीसाठी दाखल केलेले अर्ज मागे घेत असल्याचं मंगळवारी हायकोर्टाला सांगितलं. न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्यासमोर यावर सुनावणी सुरु होती. या याचिकेला या प्रकरणातील आरोपी डॉ. वीरेंद्र तावडे आणि समीर गायकवाड यांच्यावतीनं विरोध करण्यात आला होता. ही माहिती न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती मनिष पितळे यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी तपासयंत्रणांनी सादर केली. 


दोन्ही तपास यंत्रणांनी मंगळवारी तपासाचा आपला प्रगती अहवाल हायकोर्टात सादर केला. ज्यात डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्याकांडाचा तपास करणाऱ्या सीबीआयनं कोर्टाला कळवलंय की, मारेकऱ्यांसह अन्य सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून ते खटला चालवण्यासाठी तयार आहेत. तर कॉम्रेड पानसरे हत्याकांडाचा तपास करणाऱ्या एसआयटीनं कोर्टाला कळवलंय की याप्रकरणी अद्याप दोन आरोपी फरार आहेत. मात्र त्यांना फरार दाखवत तेही खटला चालवण्यास सज्ज आहेत. त्यामुळे आता लवकरच पुणे आणि कोल्हापूर सत्र न्यायालयात पुन्हा या खटल्यांवर नियमित सुनावणी सुरु होईल. मात्र या दोन्ही प्रकरणांचा तपासही समांतर सरुच राहील, असं सीबीआय आणि एसआयटीनं कोर्टाला आश्वासन दिलं आहे. तरीही पुरोगामी महाराष्ट्रात विचारवंताच्या अशाप्रकारे हत्या होणं आणि त्याच्या तपासांत वर्षानूवर्ष प्रगती न होणं ही बाब अतिशय निंदनीय असल्याचं मत यावेळी हायकोर्टानं व्यक्त केलं.


डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या कुटुंबियांनी तपासयंत्रणेच्या कारभारावर सवाल उपस्थित करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पुण्यात साल 2013 मध्ये डॉ. नरेंद्र दाभोळकरांची हत्या झाली, त्यानतंर साल 2015 मध्ये कॉम्रेड गोविंद पानसरेंना कोल्हापुरात मारण्यात आलं. मात्र तपासयंत्रणा अजूनही अपयशीच असल्याचा, याचिकाकर्त्या कुटुंबियांचा आरोप आजही कायम आहे. मात्र या दोन घटनांनंतर शेजारील राज्यात डॉ. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणांत तपास पूर्ण होऊन खटल्याला सरुवातही झाली. तिकडच्या तपासयंत्रणांनी इथं येऊन आरोपींना अटक केली होती. त्यानंतर तिथं त्यांच्या चौकशीत इकडच्या या दोन हत्यांचे धागेदोरे सापडले. त्यामुळे नक्की राज्यातील तपासयंत्रणा काय करत आहेत?, यावर मुंबई उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त करत दोन्ही तपासयंत्रणांना गंभीर होण्याचा इशारा देत जलदगतीनं तपास पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :