Coronavirus | मुंबईत कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्वांना क्वॉरन्टाईन करणार : महापौर
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 302 वर पोहोचला आहे. सर्वाधिक कोरोनाबाधित मुंबईत आहेत. कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांवर सरकार आणि महापालिकेचा फोकस आहे. या सगळ्यांनाही क्वॉरन्टाईन केलं जाणार आहे, असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितलं.

मुंबई : मुंबई आणि महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्णांच्या चिंताजनक आकडेवारीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका मुख्यालयातील वॉर रुममध्ये आढावा बैठक घेतली. या बैठकीत कोरोना झालेल्या रुग्णाचा ज्या लोकांशी संपर्क आला त्या सर्वांची माहिती घेऊन त्यांना क्वॉरन्टाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी अशा लोकांची माहिती मिळवण्यासाठी तळागाळात जाऊन काम केले जावे अशी चर्चा या बैठकीत झाल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण मुंबई आणि महाराष्ट्रात आढळून आले आहेत. महाराष्ट्रात आणि मुंबईत रोजच कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने त्याची चिंता व्यक्त करत काल (31 मार्च) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागात आढावा बैठक घेतली. या आढावा बैठकीत जे कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत अशा सर्वांच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती आशा वर्कर आणि सीएचव्ही वर्कर यांच्या माध्यमातून गोळा करुन त्या सर्वांना होम क्वॉरन्टाईन केले जाणार आहे. रुग्णाच्या सहवासात आलेल्या लोकांना क्वॉरन्टाईन केल्याने कोरोनाचा प्रसार थांबवता येणे शक्य असल्याची चर्चा या बैठकीत करण्यात आली.
क्वॉरन्टाईन करण्यासाठी विभागवार रिकाम्या इमारती, हॉल, सभागृह, हॉस्पिटल, हॉटेल आदी ठिकाणे शोधून त्याची माहिती महापालिकेला देण्याचे आदेश वॉर्ड अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत असे महापौरांनी सांगितले.
आशा वर्कर आणि सीएचव्ही वर्कर यांच्या माध्यमातून घर घरात सर्वेक्षण केले जाणार आहे. या सर्वेक्षणात सर्दी, खोकला, ताप असलेल्या रुग्ण आढळल्यास त्यांच्यासाठी वेगळी ओपीडी सुरु केली जाणार आहे. त्यांच्यासाठी वेगळे आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. सर्वेक्षण करणाऱ्या आशा वर्कर आणि सीएचव्ही कर्मचाऱ्यांना त्यांच्या सुरक्षेसाठी मास्क, ग्लोज आदी वस्तू दिल्या जाणार आहेत. जे डॉक्टर आपले दवाखाने बंद करुन बसले आहेत त्यांनाही मास्क, ग्लोव्ज, सॅनिटायझर, चेहऱ्यासमोर एक प्लास्टिक असलेले मास्क आदी सुरक्षित वस्तू देण्यात येतील.
प्रत्येक विभागात कामगार, हमाल किंवा इतरांना जेवणाची सोय होईल अशा 4 ते 5 जागा निश्चित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांना 15 दिवस पुरेल इतके अन्न देण्यासाठी केंद्र उभारली जाणार आहेत अशी माहिती महापौरांनी दिली. नागरिकांना घराबाहेर येऊ नये असे नियम घालून दिले आहेत ते सर्व नियम सर्वांनी पाळले पाहिजेत असे आवाहन करताना जर कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली तर मुंबई आवरणे मुश्किल होईल अशी चिंता महापौरांनी व्यक्त केली.
Corona in Maharashtra | महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 302वर, तर मुंबईतच 156 रुग्णBefore You Go
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report





















