मुंबई : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना सोशल मीडियावर अफवा पसरवणारेही सक्रीय झाले आहेत. कधी लॉकडाऊनच्या अफवा तर कधी कोरोनाच्या आकडेवारीविषयी अफवा पसरवल्या जात आहेत. मास्क न घातल्यास अनेक ठिकाणी आता दंड आकारला जातोय. मात्र अफवा पसरवणाऱ्यांनी आता विनामास्क दंडाविषयी देखील अफवा पसरवण्यास सुरुवात केली आहे. मुंबईत विनामास्क फिरल्यास 1000 रुपये दंड आकारला जाईल अशा अफवा सोशल मीडियावर पसरवल्या जात आहे. मात्र मुंबई विनामास्क आढळल्यास केवळ 200 दंड आकारला जाईल, असं मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी स्पष्ट केलं आहे.


पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी ट्वीट करत म्हटलं की, "प्रिय मुंबईकरांनो! फेकन्यूज पसरवणारे परत आले आहेत! यावेळी ते विनामास्क असल्यास तुम्हाला 1000 दंड भरावा लागू शकतो असा दावा करत आहेत. कोणत्याही पैशातून सुरक्षिततेशी केलेल्या तडजोडीची भरपाई केली जाऊ शकत नाही. मात्र मास्क न वापरल्यास 200 रुपयांचा दंड भरावा लागेल."





राज्यात खरंच कोरोना आहे की, फार्मास्यूटीकल कंपन्यांसाठी काही विशेष बाब? बाळा नांदगावकरांचा शासनाच्या भूमिकेवर संशय


लॉकडाऊन सुरु झाल्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाई करणार, गृहमंत्री अनिल देशमुखांचा इशारा


लॉकडाऊनबाबत चुकीचे मेसेज, फोटो तयार करु सोशल मीडियावर अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. याची दखल आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली आहे. लॉकडाऊन सुरु झाल्याच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा अनिल देशमुख यांनी दिला आहे.


अनिल देशमुख यांनी ट्वीट करत म्हटलं की, "महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन सुरू झाल्याची खोटी अफवा पसरवणाऱ्यांवर सायबर गुन्हे शाखेची करडी नजर आहे. कुठल्याही अधिकृत माहितीशिवाय खोटी माहिती प्रसारित करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित व्यक्तींविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत."





मुंबईत सार्वजनिक कार्यक्रम अन् लग्न समारंभातूनच कोरोना वाढला; बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांची माहिती


मुंबईत सार्वजनिक कार्यक्रम आणि लग्न समारंभातूनच कोरोना वाढला असल्याची धक्कादायक माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. मुंबईतील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बार, पब आणि रेस्टॉरंटसह मंगल कार्यालयांवर कारवाई केली जात आहे. सध्या मुंबईत 82 टक्के लोकांना कोरोनाची लक्षणं दिसत नाहीत. फक्त 18 टक्के लोकांनाच रुग्णालयात दाखल करावे लागत आहेत. बहुतांश रुग्ण हे उच्चभ्रू वस्तीतील आहेत, असंही सुरेश काकाणी यांनी सांगितलं. मात्र, कोरोनाचा संसर्ग वाढत असला तरी सध्यातरी मुंबईत संचारबंदी लागू करण्याचा विषय अजेंड्यावर नसल्याचंही काकाणी यांनी सांगितलं.