मुंबई : लॉकडाऊनमुळे अनेक छोटे-मोठे उद्योगधंदे, शेती व्यवसाय संकटात आहे. पर्यायाने या क्षेत्रात काम करणारे असंख्य कामगार आज बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे आगामी काळात हे उद्योगधंदे वाचवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारने एकत्रित उपोययोजना करणे, आवश्यक असल्याचे मत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मांडले. कोरोनाशी लढताना या एबीपी माझाच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लघु उद्योग, मोठमोठ्या कंपन्या आणि शेती व्यावसाय वाचवण्यासाठी आगामी काळात सरकारने यांना आधार देण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली. कोरोनाशी लढताना आतापर्यंत लोकांनी खूप चांगले सहकार्य केलंय. यापुढेही अशाच सहकार्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले.


20 एप्रिलपासून काही उद्योगांना शिथिलता देण्यात आली होती. मात्र, मुंबई, पुण्यात गर्दी वाढल्याने हा नियम मागे घेण्यात आला. लोकांनी आतापर्यंत खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आहे. इतक्या मोठ्या संख्येने लोकांना एकाच जागी थांबवून ठेवणे हे प्रशासनाचं यश आहे. मात्र, काही ठिकाणी लोकांनी नियम मोडले. यापाठीमागे कुठेतरी जनजागृती कमी पडल्याचं दिसतंय. नागरिकांनीही काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात. कारण, या सर्व गोष्टी त्यांच्या सुरक्षेसाठीच सुरु आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचे अहवाल पाहिले तर ही फक्त सुरुवात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात परिस्थितीत हाताबाहेर जाऊ नये, यासाठी नागरिकांच्या सहकार्य आवश्यक असल्याचे रोहित पवार म्हणाले.


Coronavirus | नवी मुंबईत एकाच आयटी कंपनीतील 19 कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह


उद्योगधंद्यांना वाचवण्यासाठी थोडी शिथिलता द्यावी लागेल
उद्योगधंदे सुरू करण्यासाठी काही नियम आणि अटी आवश्यक आहेत. तशा प्रकारची नियमावली आली आहे. मात्र, हे नियम कठोर आहेत. पण, त्याची सध्याच्या काळात फार गरज आहे. केरळ राज्याचं उदाहरण घ्यायचं झालं तर तिथं लॉकडाऊन मोठ्या प्रमाणात होते. मात्र, केंद्र सरकारने तिथं थोडी शिथिलता आणवी लागेल, असं सांगितलं. आपल्या देशात मोठ्या प्रमाणात लघुउद्योग आहे. या लघुउद्योगावर जवळपास 11 कोटी लोक काम करत आहेत. त्यामुळे या सर्वांना दिलासा देण्याची गरज आहे. लॉकडाऊनच्या काळात उद्योगधंद्यांचे जे नुकसान झालं आहे. त्यांना काही सवलती देण्यासाठी येत्या काळात निर्णय घ्यावे लागतील. चीनी मालाविरोधात आपल्याला ठोस निर्णय घ्यावे लागतील. ज्या वस्तू आपण चीनकडून विकत घेतो, अशा गोष्टी देशात तयार कशा होतील, यासाठी अशा उद्योगधंद्यांना प्रेरणा द्यावी लागेल. यातून आपल्याला आयात-निर्यातीचे संतुलन साधता येईल.


वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला केल्यास सहा महिने ते सात वर्षांची शिक्षा; केंद्र सरकारचा अध्यादेश


शेती उद्योग वाचवणं आवश्यक
कोरोना व्हायरसने देशात शिरकाव केला, त्यावेळी शेतकऱ्यांच्या फळबागा बहरल्या होत्या. त्यामुळे ऐन सुगीच्या काळात निर्यातबंदी झाल्याने आपला शेतकरी अडचणीत आला. त्याचप्रमाणे मोठ्या शहरात जाणारा शेतीमाल जाण्याचे प्रमाणही कमी झाल्याने शेतकऱ्याला दुहेरी फटका बसला आहे. शेतीमाल वाहतूक करणारे चालक पूर्वी ढाबे, हॉटेलवरती जेवायला थांबायचे. लॉकडाऊनमुळे हे सर्व बंद असल्याने त्यांचीही गैरसोय होत आहे. त्याचाही परिणाम होत आहे. चिकनमुळे कोरोना होतो, अशा अफवा पसरल्याने पोल्ट्री व्यावसायला त्याचा मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळाले. परिणामी त्या क्षेत्रात जे काम करत होते त्यांनाही याचा फटका बसला. या सर्व उद्योगधंद्यांना वाचवण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारला एकत्रित पावले उचलण्याची गरज आहे.


Rohit Pawar on Coronavirus | कोरोना व्हायरसशी लढताना आमदार रोहित पवार यांचं मत काय? | ABP Majha