Thane Unlock | 15 ऑगस्टपासून ठाण्यातील सर्व दुकाने खुली राहणार!
ठाणे शहरातील जी आस्थापने P1 आणि P2 नुसार सुरु होते ते 15 ऑगस्टपासून राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सकाळी 9 ते रात्री 7 पर्यंत सुरु ठेवण्यात येतील.

ठाणे : मुंबई पाठोपाठ आता ठाण्यातील सर्व दुकानं खुली होणार आहेत. 15 ऑगस्टपासून सर्व दुकानं आठवड्यातून सातही दिवस खुली ठेवण्यास ठाणे महापालिकेने परवानगी दिली आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिकारी आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोतर्ब करण्यात आलं.
ठाणे शहरातील जी आस्थापने P1 आणि P2 नुसार सुरु होते ते 15 ऑगस्टपासून राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सकाळी 9 ते रात्री 7 पर्यंत सुरु ठेवण्यात येतील. तसंच मॉल्स, मार्केट, जिम आणि स्वीमिंग पूलबाबत आढावा घेऊन त्यानंतर निर्णय घेण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला केल्या आहेत.
कोविड-19 चं संकट अद्यापही टळलेलं नाही. ठाणे महापालिका चांगलं काम करत असून कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, असं एकनाथ शिंदे व्यापारी संघटनांच्या बैठकीत म्हणाले. महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या अध्यक्षतेखली पार पडलेल्या या बैठकीला खासदार राजन विचारे, महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा आणि विविध व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुंबईत 5 ऑगस्टपासून सर्व दुकानं सकाळी 9 ते संध्याकाळी 7 या वेळेत उघडणार
ठाणे महापालिका क्षेत्रात जून महिन्यात लॉकडाऊन शिथिली केल्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता. हा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी 2 ते 19 जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू केला होता. त्यानंतर P1 आणि P2 पद्धतीने दुकाने सुरु करण्यास परवानगी दिली होती. आधीचे चार महिने लॉकडाऊनमुळे दुकानं बंद होती. सम-विषय नियमामुळे महिन्यातून पंधरा दिवस व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवावी लागत आहेत. त्यामुळे व्यापारी वर्ग आर्थिक संकटात सापडला होता. सध्या सण-उत्सवांचा काळ असल्यामुळे नागरिकांची दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी होण्याची भीती आहे. त्यामुळे ही गर्दी टाळण्यासाठी आठवड्यातील सातही दिवस सर्वच दुकानं सुरं ठेवण्याची मागणी व्यापारी संघटनांनी केली होती. यासाठी संघटनेच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह आयुक्त आणि शहरातील सर्वच आमदारांची भेट घेतली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी 13 ऑगस्ट रोजी या मागणीला मान्यता दिली.
ठाणे महानगरपालिका क्षेत्रात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87 टक्के असून रूग्ण दुप्पटीचा वेगही 90 दिवसांवर पोहोचला आहे. मृत्यूचे प्रमाण हे 3.5 टक्क्यांवरुन 3.2 टक्क्यांवर आले आहे. ठाणे महापालिका सातत्याने करत असलेल्या प्रयत्नांमुळेच हे शक्य झाल्याचं सांगून एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा आणि महापालिका प्रशासनाचं कौतुक केलं.
Before You Go
Abhijeet Dipke Cockroach Janta Party PC : आता मी एकटा नाही, लाखो तरुण माझ्यासोबत : अभिजीत दीपके





















