मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी एक गर्भवती, तिचा पती आणि दोन प्रवाशांना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी विमानात चढण्यास मज्जाव केला. हे प्रवासी मुंबईहून नागपूरला जात होते.


डोंबिवलीच्या मानपाडामध्ये राहणारे व्यावसायिक रजनीकांत चतुर्वेदी यांच्या माहितीनुसार, "सोमवारी पत्नीसोबत मुंबईहून नागपूरला जाण्यासाठी त्यांनी एअर इंडियाच्या विमानाचं तिकीट खरेदी केलं होतं."

"माझ्या तिकीटाचा नंबर 0985318448384 आणि पत्नीच्या तिकीटाचा नंबर 0985318448383 असा आहे. विमान पहाटे 5 वाजून 40 मिनिटांनी उड्डाण करणार होतं. त्यामुळे आम्ही 4 वाजून 55 मिनिटांनी विमानतळावर पोहोचलो. आमच्यासोबत आणखी एक-दोन प्रवासी होते. आम्ही बोर्डिंग पाससाठी संबंधित काऊंटरवर पोहोचलो, पण काऊंटर बंद असल्याचं कारण देत, आम्हाला विमानात चढण्यास मज्जाव केला," असा आरोप रजनीकांत चतुर्वेदी यांनी केला आहे.

बोर्डिंग पास देण्याची विनंती
त्यांच्यासोबत असलेल्या इतर महिलांनीही एअर इंडियाच्या कर्माचाऱ्यांना बोर्डिंग पास देण्याची विनंती केली. पण त्यांनी ऐकलं नाही. अखेर तीन-चार तास माथेफोड केल्यानंतर रजनीकांत तसंच सहप्रवाशांना आपला प्रवास रद्द करुन घरी परतावं लागलं. रजनीकांत यांच्या पत्नी सरकारी क्षेत्रात काम करतात आणि ड्यूटीवर जॉईन करण्यासाठी पतीसोबत नागपूरला जात होत्या.

गैरवर्तनाचा आरोप
रजनीकांत यांनी एअर इंडियाचे सिक्युरिटी इन्चार्ज दीपक पाटील यांच्यावर महिलांशी गैरवर्तनाचा आरोप केला. याबाबत रजनीकांत यांनी दीपक पाटलांविरोधात एअरपोर्ट पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. "पण हे गुन्हेगारी प्रकरण असून त्यांनी एअर इंडिया प्रशासनाकडे तक्रार करावी किंवा ग्राहक फोरममध्ये जावं," असं पोलिसांनी रजनीकांत चतुर्वेदी यांना सांगितलं.

हेल्पलाईनकडून ‘नो रिस्पॉन्स’
"एयर इंडिया कर्मचाऱ्यांची वागणूक आणि वेळ असूनही बोर्डिंग पास न दिल्याची तक्रार करण्यासाठी एअर इंडिया हेल्प डेस्कच्या नंबर आणि फीडबॅक सेंटरमध्ये मेल आणि फोन केले. पण एअर इंडिया प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही," असं रजनीकांत यांनी सांगितलं. मात्र एअर इंडियाचे प्रवक्ते प्रवीण भटनागर म्हणाले की, "एअर इंडिया प्रशासनाचं प्रवाशांच्या तक्रारींवर लक्ष असतं."