मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) झोपडलं आहे. काही ठिकाणी उकाड्यापासून दिलासा मिळाला असला, तर काही ठिकाणी शेतीचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 20 मेपर्यंत अवकाळी पावसाचं संकट कायम आहे. आज महाराष्ट्रात काही ठिकाणी जोरदार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता आहे, तर मुंबई, ठाणे, पालघरमध्ये तुरळक ठिकाणी काही तासांसाठी पावसाची रिमझिम पाहायला मिळू शकते. मात्र, दिवसभर उकाडा जाणवण्याची शक्यता आयएमडीने वर्तवली आहे.


राज्यात अवकाळी पुन्हा बरसणार


पुढील 24 तासात राज्यात विविध भागात पावसाची शक्यत वर्तवण्यात आली आहे. तर काही भागात उष्णतेच्या लाटेला इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, रायगड, रत्नागिरीमुळे तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. याशिवाय सिंधुदुर्गात जोरदार पावसाची शक्यता असून जिल्ह्याला अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. 


वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाची शक्यता


दरम्यान, जळगाव, नाशिकमध्येही अवकाळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे. अहमदनगर, कोल्हापूर, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे, सातारा, नाशिक, जळगावमध्ये पावसाच्या रिमझिम सरी पाहायला मिळतील. 






या जिल्ह्यांना यलो अलर्ट 


जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला, अमरावती, बुलढाणा या जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. या भागात गारपीट आणि वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहनही केलं आहे.


या जिल्ह्यांना पुढील तीन दिवसांसाठी यलो अलर्ट


हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, अनेक राज्यांना आजपासून पुढील तीन दिवसांसाठी अवकाळी पावसाची यलो अलर्ट देण्यात आला आहे. नांदेड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट असून ताशी 30-40 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे. याशिवाय, परभणी, बीड, हिंगोली जिल्ह्यांना दोन दिवसांसाठी मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.