Vidarbha Unseasonal Rain : हवामान विभागाने (IMD) देलेल्या इशाऱ्यानुसार नागपूरसह विदर्भातील (Vidarbha) बहुतांश जिल्ह्यांना अवकळी पावसाने (Unseasonal Rain) अक्षरक्ष: झोडपून काढले आहे. राज्यात एकीकडे पाणीटंचाईचे भीषण सावट असताना दुसरीकडे मात्र अवकाळी पावसाने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांची दाणादान उडवल्याचे चित्र आहे. तर आगामी काळात अवकाळी पावसाचे हे ढग आणखी गडद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.


ऐन उन्हाळ्यात अवकाळी पावसाने एंट्री केल्याने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावला आहे. तसेच त्याचा फटका महावितरण (Mahavitaran)  विभागालाही बसला आहे. एकट्या वर्धा जिल्ह्यात (Wardha News) अवकाळी पावसामुळे तब्बल 44 लाख 51 हजारांचे नुकसान झाले आहे. हे नुकसान अवघे एका महिन्यात झाल्याची माहिती महावितरण विभागाकडून देण्यात आली आहे.  


हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट जारी


हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. विदर्भातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पावसाने अक्षरक्ष: धुमाकूळ घालत अनेकांचे मोठे नुकसान केले आहे. तर या अवकाळीचा सर्वाधिक फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे. आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा हाता-तोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतलाय.


अशातच पुढील दोन दिवस विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना नागपूर प्रदेशीक हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केलाय. तर आज 11 मे ते 15 मे दरम्यान विदर्भातील अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपीट, विजांच्या कडकडाटास 30-40 प्रतितास सोसाट्याचा वारा येणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.


एका महिन्यात महावितरणचे 44 लाख 51 हजारांचे नुकसान


या अवकाळी पावसाचा फटका महावितरण विभागालाही बसला आहे. वर्धा जिल्ह्यात एप्रिल महिन्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्याने महावितरणचे 44 लाख 51 हजारांचे नुकसान झाले आहे. एप्रिल महिन्यात जिल्ह्यात वेगवेगळ्या भागातील वादळात वीज खांब वाकलेत तर कुठे विजेच्या तारांवर झाडे कोसळल्याने मोठे नुकसान झालंय. ही परिस्थिति एप्रिल महिन्यातली असली तरी मे महिन्यात झालेल्या अवकळी पावसाच्या नुकसानाची आकडेवारी आणखी वाढण्याची शक्यता आहे. 


तात्काळ पंचनामे करण्याचे कृषी विभागाला निर्देश 


गोंदिया जिल्ह्यात 7 ते 10 मे दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात धान पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळीने शेतकऱ्यांचा तोंडचा घास हिरावल्याने मोठे आर्थिक संकट शेतकऱ्यांवर कोसळले आहे.  गोंदिया विधानसभा क्षेत्रात देखील या अवकाळी पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. त्यामुळे अपक्ष आमदार विनोद अग्रवाल यांनी गोंदिया तालुक्याचा दौरा करून अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी कृषी आणि महसूल विभागांचे अधिकारी सुद्धा उपस्थित होते. नुकसानीचे योग्य पंचनामे करण्याचे निर्देश यावेळी आमदार विनोद अग्रवाल यांनी कृषी विभागाला दिलेत. तर शासनाकडून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत कशी देता येईल, यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचे आमदार अग्रवाल म्हणाले.


इतर महत्वाच्या बातम्या