Appasaheb Nalvade Gadhinglaj Sugar Factory : दोन राष्ट्रवादीच्याच आमदारांमध्ये कुस्ती लागल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्याच्या (गोडसाखर) निवडणुकीसाठी रविवारी शांततेत 69.18 टक्के मतदान झाले. 25 हजार 91 पैकी 17 हजार 360, तर संस्था गटामध्ये 204 पैकी 237 सभासदांनी मतदान केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश जगताप यांनी दिली. दरम्यान उद्या मंगळवारी गडहिंग्लज शहरातील गांधीनगरमधील पॅव्हेलियन हॉलमध्ये सकाळी आठपासून मतमोजणी होईल. 


या निवडणुकीत शाहू सभेचा शेतकरी आघाडी व काळभैरव शेतकरी कामगार विकास आघाडी थेट लढत होत आहे. 19 जागांसाठी 43 उमेदवार रिंगणात आहेत. पाच अपक्षही आहेत. तालुक्यातील 74 केंद्रांवर 700 हून अधिक कर्मचाऱ्‍यांनी ही प्रक्रिया पूर्ण केली. किरकोळ वादावादी वगळता शांततेत मतदान झाले. शाहू आघाडीचे आमदार हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर, प्रकाश शहापूरकर, प्रकाश चव्हाण, संग्राम कुपेकर यांनी तर काळभैरव आघाडीचे नेते आमदार राजेश पाटील, श्रीपतराव शिंदे, संग्रामसिंह नलवडे, स्वाती कोरी, शिवाजी खोत यांनी विविध केंद्रांवर भेटी देऊन मतदानाची माहिती घेतली.


दरम्यान, मंगळवारी मतमोजणी पालिकेच्या गांधीनगर पॅव्हेलियन हॉलमध्ये मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. एका टेबलवर दोन केंद्रांची मतमोजणी होईल. प्रत्येक 50 मतपत्रिकांचे गट्टे तयार करून मतांची मोजणी होणार आहे. प्रत्येक केंद्रातील मतदारसंख्येवर आधारित फेऱ्या निश्चित होतील. 


मुश्रीफ व पाटील यांच्यात ही प्रतिष्ठेची लढत 


या निवडणुकीमध्ये हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी गडहिंग्लजमधील कुपेकर गटासह भाजप, शिवसेना, स्वाभिमानी, काँग्रेस, अप्पी पाटील यांना सोबत घेऊन आघाडी केली आहे. आमदार राजेश पाटील यांनी जनता दल, निवृत्त कामगार संघटना, काँग्रेस युतीची आघाडी रिंगणात उतरविली आहे. त्यामुळे एकाच पक्षाचे आमदार असलेले मुश्रीफ व पाटील यांच्यात ही प्रतिष्ठेची लढत आहे. राष्ट्रवादीचे जिल्ह्यात दोनच आमदार आहेत. मात्र, त्यांच्यातही गटबाजीचे ग्रहण आहे. त्यामुळे गोडसाखर निवडणुकीमध्ये ‘राष्ट्रवादी’मधील या दोन्ही आमदारांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. हसन मुश्रीफ बाजी मारणार की गोकुळमधील जिव्हारी लागलेल्या पराभवाचे राजेश पाटील परतफेड करणार याकडे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. 


दुसरीकडे गेले आठ दिवस शहरासह ग्रामीण भाग उमेदवारांनी पिंजून काढला. मतदारांपर्यंत जाऊन भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला गेला. 


इतर महत्वाच्या बातम्या